‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण !
लखनऊ, 21 एप्रिल (हिं.स.) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष यानिमित्ताने गोवा येथे १७ ते १९ मे या कालावधीत होणार्या भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण आज ‘गोरक्षपीठ पीठाधीश्वर’ तथा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथ यांना देण्यात आले.
या वेळी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या ‘स्वागत समिती’तील सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, जौनपूर, मडियाहू विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. रविंद्रकुमार पटेल आणि श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ येथील मुख्यमंत्री कार्यालयात श्री. योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.
या वेळी प्रथम सनातन संस्थेच्या २५ वर्षांतील कार्याविषयी मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली. सनातन संस्थेचे कार्य ऐकल्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथ म्हणाले की, सनातन संस्थेचे चांगले कार्य चालू आहे. या कार्याबद्दल तुमचे अभिनंदन ! सध्या हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत. अधिकाधिक हिंदूंना संघटित करणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमाच्या माध्यमांतून अधिकाधिक हिंदूंना संघटित करा, असा आशीर्वादही त्यांनी या वेळी दिला.
या वेळी ‘सनातन संस्था’निर्मित श्रीरामाचे सात्त्विक चित्र असलेली मोठी प्रतिमा, तसेच हिंदु जनजागृती समितीने निर्मिलेली ‘हिंदू राष्ट्र आवश्यक क्यो ?’, ‘हिंदू राष्ट्र स्थापना की दिशा’, ‘हिंदू राष्ट्र खंडण एवं आक्षेप’ आणि ‘हलाल जिहाद’ ही हिंदी भाषेतील पुस्तके मुख्यमंत्री श्री. योगीजी यांना भेट देण्यात आली.