अमरावती, 30 मे, (हिं.स.) सोयाबीन उत्पादक हंगामाच्या बियाणांमध्ये वेळी उगवणक्षमता आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी अनेक पद्धतीचा प्रयोग करीत होते. ‘पोटोण्डी’ ही त्यापैकी एक पद्धत ! ही पद्धत दहा-पंधरा वर्षापूर्वी चांगलीच प्रचलित होती. मात्र, सध्याच्या घडीला या पद्धतीचा कोणीच अवलंब करीत नाही. बदलत्या काळाच्या ओघात पोटोण्डी पद्धत बंद झाली असल्याचे दिसून येत आहे.
सध्या आवते व पन्हें भरण्याचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु, शेतकरी पोटोण्डी पद्धतीचा अवलंब करीत असल्याचे दिसून येत नाही. कृषी केंद्रावरून बियाणे घेऊन सरळ शेतावर नेऊन लगेच आवते आणि पन्हे भरणी शेतकरी करीत आहेत. मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर शेतकरी आवते आणि पन्हे भरणीच्या जागेची मशागत करायचे. नंतर पावसाला सुरुवात झाली की घरीच साठवून ठेवलेल्या बियाणांमध्ये उगवणक्षमता आहे किंवा नाही हे तपासून पाहण्यासाठी पोटोण्डी या पद्धतीचा प्रयोग करीत असत. पण आता काळ बदलला आहे. शेतीत मोठ्या प्रमाणात यांत्रिक पद्धतीचा शिरकाव झाल्यामुळे घरीच तयार केलेले बियाणे साठवून ठेवण्याची पद्धत बंद झाली आहे. परिणामी अनेकदा शेतकऱ्यांची फसगत होते. कृषी केंद्रातून खरेदी केलेले बियाणे उगवलेच नाही, अशा तक्रारी अनेकदा कानावर येताना दिसत आहेत.
काय आहे पोटोण्डी पद्धत ?
पोटोण्डी पद्धतीत साठवून ठेवलेल्या बियाणांमधून ऑजळभर धान्ये काढून ते कापसाच्या बोळ्यामध्ये किंवा ओल्या गोणपाटामध्ये टाकले जायचे, नंतर तो कापसाचा बोळा किंवा गोणपाट छोटी टोपली किंवा पानापासून बनवलेल्या द्रोणात ठेवला जात असे. गरजेनुसार पाणी देण्यात येत होते. चार-पाच दिवसात या धान्याला अंकुर आले नाहीत तर या बियाणामध्ये उगवणक्षमता नाही, असे समजले जायचे, शेतकरी दुसऱ्या बियाणांची शोधाशोध करायचे.