नवी दिल्ली , 24 एप्रिल (हिं.स.)।पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे.या घटनेनंतर केंद्र सरकारने पाकिस्तानची कोंडी करणारे बरेच निर्णय घेतले आहेत. त्यानंतर आता खेळासंदर्भात एक मोठा निर्णय घेत पाकिस्तानला दणका दिला आहे. सध्या पाकिस्तानमध्ये पीएसएल अर्थात पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र पहलगाम घटनेनंतर भारतात पीएसएलचे सामने न दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात पीएसएलचं प्रसारण करणाऱ्या कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएसएल स्पर्धतील सामन्यांच्या लाईव्ह स्ट्रीमिंगवर बंदी घातल्याने भारतात हे सामने पाहता येणार नाही. त्यामुळे पीएसएल पाहणाऱ्यांच्या संख्येत आपोआप घट होईल, ज्याचा थेट फटका बसेल. तसेच या निर्णयामुळे आर्थिक कोंडी होण्यास मदत होईल. पीएसएलच्या प्रसारणावर बंदीमुळे पाकिस्तान क्रिकेटसाठी हा मोठा झटका आहे.दरम्यान, पीएसएल 2025 स्पर्धेत एकूण 6 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी चुरस आहे. या स्पर्धेला 11 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. तर 18 मे ला विजेता निश्चित होणार आहे. मात्र भारतात आता या स्पर्धेच्या प्रसारणावर बंदी घातल्याने पाकिस्तान क्रिकेटची चांगलीच आर्थिक कोंडी होणार, हे मात्र निश्चित झालं आहे.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आला. आयपीएल 2025 मध्ये खेळत असलेल्या अनेक खेळाडूंनी संताप व्यक्त करत या दहशतवाद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच मृतांना श्रद्धांजलीही वाहिली. बुधवारी 23 एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याआधी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच हा सामना अगदी साधेपणाने खेळवण्यात आला.
————————