इस्लामाबाद, 13 मे (हिं.स.)।ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला. या कारवाईत पाकिस्तानचे ११ सैनिकांचा मृत्यू झाला आहे तर ७८ जण जखमी झाले आहेत.पाकिस्तानी लष्कराचे ६ जवान आणि एअरफोर्सचे ५ जवान ठार झाल्याचं पाकिस्तानने मान्य केले आहे. याशिवाय गोळीबारात 40 नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.भारतीय मिसाईल हल्ल्यांमुळे पाकिस्तानी हवाई दलालाही मोठे नुकसान झाल्याचेही पाकिस्तानने कबुल केले आहे.
पाकिस्तानी माध्यमांनुसार, पाकिस्तानी लष्कराने मंगळवारी(दि.१३) भारतासोबत संघर्षादरम्यान झालेल्या लष्करी आणि नागरी हानीचा अधिकृत तपशील जारी केला आहे. इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) नुसार, 6 आणि 7 मे रोजी भारतीय कारवाईला प्रत्युत्तर देताना पाकिस्तनाचे ऑपरेशन ‘बुनयान-उन-मार्सस’ दरम्यान देशाचे रक्षण करताना 11 सैनिक ठार झाले आणि 78 कर्मचारी जखमी झाले.
भारतीय हल्ल्यात ठार झालेले सहा सैनिकांमध्ये नायक अब्दुल रहमान, नायक वकार खालिद, लान्स नायक दिलावर खान, इकरामुल्लाह, सिपाही अदील अकबर आणि सिपाही निसार यांचा समावेश आहे. तसेच भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत पाकिस्तानी लष्कराचे अनेक सैनिक जखमी झाले आहेत, याचा पुरावा समोर आला आहे. लष्करी हानीशिवाय, LoC च्या पलीकडून झालेल्या गोळीबारात अनेक नागरिकही जखमी झाले. ISPR च्या निवेदनानुसार, 7 महिला आणि 15 मुलांसह 40 नागरिकांचा बळी गेला, तर 121 इतर लोक जखमी झाले, ज्यात 27 मुले आणि 10 महिलांचा समावेश आहे.
अलीकडेच पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीर हे रावळपिंडीतील एका रुग्णालयात जखमी सैनिकांना भेटण्यासाठी गेले आहेत. ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यापूर्वी पाकिस्तान आणि पाकिस्तानी लष्कर भारतीय हवाई हल्ल्यातील आपल्या नुकसान आणि सैनिकांच्या मृत्यूच्या दाव्यांचा सातत्याने खंडन करत होते. आता पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांचा भंडाफोड झाला आहे.