पुणे, 19 मे (हिं.स.)। पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) भारतात विलीन होणे गरजेचे आहे, तरच दहशतवादी कारवाया थांबतील. त्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेऊन संबंधित भूभाग भारताकडे विलीन करावा अन्यथा युद्ध अटळ आहे,’ असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात व्यक्त केले. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.
रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटक सचिव परशुराम वाडेकर आणि इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
आठवले म्हणाले, ‘भारतात होणारे दहशतवादी हल्ले, कारवाया पाकव्याप्त काश्मीरमधूनच होत आहे. सातत्याने होणाऱ्या कारवाया पाकिस्तानमधूनच होत असल्याचे सिद्ध होत असल्याने, भारताकडून पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दाखवून दिले आहे. त्यामुळे पाकिस्तानने काश्मीरमधील व्यापलेला भूभाग (पीओके) भारताकडे सोपवावा आणि दहशतवादी कारवाया थांबवाव्यात, असा प्रस्ताव भारताने मांडला आहे.