अहमदाबाद, १२ जून, (हिं.स.) : गुजरातच्या अहमदाबाद शहरात आज गुरुवारी दुपारी एक भीषण विमान अपघात घडला. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या दिशेने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानतळापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलायनर ७८७ हे प्रवासी विमान मेघानी नगर परिसरात कोसळले आहे. विमानात एकूण २४२ प्रवासी आणि कर्मचारी सवार असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बचाव आणि मदत कार्य सुरु करण्यात आले आहे.
विमानात टेकऑफनंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाचा विमानावरील ताबा सुटला आणि ते मेघानी नगर येथील मोकळ्या मैदानात कोसळले. या दुर्घटनेनंतर परिसरात प्रचंड आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरले, ज्यामुळे आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघातानंतर काही इमारतींना देखील नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर विमानाचे काही अवशेष आणि एक पंख तुटून पडलेले दिसले. घटनास्थळी तातडीने पोलीस, अग्निशमन दल, आपत्कालीन बचाव पथके आणि स्थानिक प्रशासनाने धाव घेतली. आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा करण्यात आला असून, काही प्रमाणात आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. अनेक जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघातामागील नेमके कारण शोधण्यासाठी विमानन प्राधिकरण आणि तांत्रिक तज्ज्ञांनी तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष तज्ज्ञांचे पथक लवकरच ब्लॅक बॉक्सची तपासणी करणार असून, त्यानंतर अपघाताचे खरे कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. सध्या विमानात 133 प्रवासी असल्याची माहिती समोर आली असली तरी, अधिकृत दुजोरा प्रतीक्षेत आहे. तसेच, या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानातून प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती आहे.
विमान अपघाताची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरात मुख्यमंत्र्यांना फोन करुन माहिती घेतली आहे. तसेच, पोलीस आयुक्त, गुजरातच्या गृहमंत्र्यांना देखील अमित शाहांनी फोन केला. केंद्र सरकारकडून विमान दुर्घटनेनंतर सर्वतोपरी मदत व सहकार्याचे आश्वासन अमित शाह यांनी फोनवरुन दिले आहे.
या दुर्घटनेनंतर प्रशासनाने मेघानी नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विमानतळ परिसरातही कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि केवळ अधिकृत माहितीचीच वाट पाहण्याचे आवाहन करण्यात आले असून बचावकार्य आणि तपास प्रगतीपथावर आहे.