नवी दिल्ली , 23 एप्रिल (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी(दि.२२) जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत त्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना सोडले जाणार नाही, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘एक्स’ वरून म्हटले आहे की,”जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती माझ्या सहवेदना व्यक्त करतो. या हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो. या हल्ल्यातील पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना न्यायालयाच्या चौकटीत आणले जाईल…त्यांना माफ केले जाणार नाही! त्यांचा कुटील हेतू कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा संकल्प अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल.”