नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. मोठ्या जनसमुदायाला आपल्या भाषणाच्या जोरावर जिंकण्याची वक्तृत्व कला त्यांच्याजवळ निश्चितच आहे. ते देशातील ज्या भागात जातात, त्या भागातील लोकांना आपल्या या कौशल्याच्या जोरावर आपलंस करुन घेतात. मग पंतप्रधान मोदींची ही भाषणे लिहतं तरी कोण? असा प्रश्न विचारला जातो. याचे उत्तर माहिती अधिकारात समोर आले आहे.
माहिती अधिकाराअंतर्गत माहीती मागवली गेली आहे. आणि याची उत्तरे देखील पंतप्रधान कार्यालयाने दिली आहेत. मात्र या अर्जामध्ये पीएमओला विचारलं गेलं होतं की पंतप्रधानांची भाषणे कोण लिहतं? तसेच या टीममध्ये किती लोक आहेत? भाषण लिहण्यासाठी किती खर्च होतो? मात्र अशा काही प्रश्नांची उत्तरे पीएमओ कार्यालयाकडून देण्यात आली नाहीयेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंतप्रधान मोदी निवडणुकीची भाषणे असोत, संसदेतील भाषणे असोत, मन की बातमधून दर महिन्याला व्यक्त होणं असो अथवा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर एखाद्या समारंभात बोलणं असो, ते प्रत्येक ठिकाणी श्रोत्यांशी आपल्या खास शैलीतून संवाद साधत असतात. जे सांगायचंय ते ठामपणे तसेच उपहासाने आणि टीकात्मक बोलण्यात देखील त्यांचा हातखंडा आहे. अनेकदा आपल्या भाषणातून चुकीची वक्तव्ये केल्यामुळे त्यांच्यावर टीकादेखील होते. मात्र, तरीही त्यांची भाषणे लोकप्रिय ठरतात.
इंडिया टुडेने पंतप्रधान मोदींच्या या भाषणांबाबत सविस्तर माहीती मागवली होती. याच्या उत्तरादाखल पीएमओ कार्यालयाने सांगितलंय की, पतंप्रधान आपल्या भाषणाला अंतिम रुप स्वत:चं देतात. ज्या प्रकारचा कार्यक्रम असतो, त्यानुसार त्यांना वेगवेगळ्या व्यक्तींची, अधिकाऱ्यांची, विभागांची, संघटनांची माहिती दिली जाते. या माहितीच्या आधारेच ते आपल्या भाषणांना अंतिम स्वरुप देतात.