अमरावती, 13 जून, (हिं.स.) शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकाला हमीभाव यांसह विविध मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांच अन्नत्याग आंदोलन सुरु असताना आता अमरावती मधून आक्खी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाशी दखल न घेतल्याने प्रहारच्या कार्यकर्त्याने विषप्राशन केलं आहे. अजय भागवतराव चौधरी (35) असं सदर कार्यकर्त्याचे नाव असून ते रा. करजगाव ता. वरुड येथील रहिवासी आहेत. त्यांना तातडीने दवाखाण्यात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.
खरं तर महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना जी आश्वासने दिली होती ती अद्यापही पूर्ण न केल्याने बच्चू कडू यांनी विविध १६ मागण्यांसह ८ जूनपासून मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी बेमुदत अन्नत्याग आंदोलन केलं आहे. या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. मात्र सरकारने अजूनही शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्यांना आणि बच्चू कडू यांच्या आंदोलनाला गंभीर्याने घेतलेले नाही. हीच सल मनात ठेऊन प्रहार वरुड तालुका संपर्क प्रमुख अजय भागवतराव चौधरी यांनी आज विष प्राशन विष प्राशन केलं. अजय चौधरी यांचं वय वर्ष 35 असून ते करजगावचे रहिवासी आहेत. विषप्राशन करताच त्यांना तातडीने वरुड येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बच्चू कडूंना रक्ताची उलटी
दुसरीकडे बच्चू कडू यांचीही तब्येत आज ढासळली. आज बच्चू कडू याना अचानक रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारी जनता चिंतेत पडली आहे. या राज्यात सध्या रोज कित्तेक शेतकरी आत्महत्या करतायत. रोज या राज्यात शेतकऱ्याची अंत्ययात्रा निघतेय. सरकारला बच्चूभाऊंची अंत्ययात्राच पाहायची आहे काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
१५ जूनला राज्यभरात चक्काजाम आंदोलन
दरम्यान, आता प्रहार संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्या अन्यथा १५ जूनला संपूर्ण राज्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा थेट इशारा सरकारला देण्यात आला आहे. .या चक्काजाम आंदोलनात कोणतीही गाडी रस्त्यावर फिरताना दिसणार नाही. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी…. शेतकऱ्यांची काळजी असणाऱ्या विविध संघटनांनी आणि बच्चू कडू याना पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन प्रहार कडून करण्यात आलं आहे.