नवी दिल्ली , 13 मे (हिं.स.)।भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी(दि.१२) देशाला संबोधित केले.यावेळी त्यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.त्यानंतर आता आज, मंगळवारी (13 मे) पहाटे पंतप्रधान मोदी अचानक आदमपूर एअरबेसवर पोहोचले. येथे त्यांनी लष्कराच्या जवानांची भेट घेऊन ऑपरेशन सिंदूरबद्दल चर्चा आणि त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पंतप्रधानांसोबत एअर चीफ मार्शल एपी सिंग देखील उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आदमपूर एअरबेसस येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सैनिकांशी 6 मे च्या रात्री केलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दलही चर्चा केली. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसला भेट देणे खूप खास मानले जात आहे. याचे कारण म्हणजे, पाकिस्तानने हा एअरबेस उडवल्याचा दावा केला होता. पण, आता स्वतः पीएम मोदी येथे पोहोचल्यामुळे पाकिस्तानच्या खोट्या दाव्याची पोलखोल झाली आहे. पंतप्रधानांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या भेटीचे काही फोटोही शेअर केले आहेत.
या बैठकीची माहिती देताना पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, “आज सकाळी एएफएस आदमपूरला भेट दिली आणि आपल्या शूर हवाई योद्ध्यांची भेट घेतली. धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयतेचे प्रतीक असलेल्या जवानांसोबत वेळ घालवणे अतिशय खास अनुभव होता. आपल्या देशासाठी आपल्या सशस्त्र दलांनी जे काही केले आहे, त्यासाठी भारत नेहमीच त्यांचे आभारी राहील.”दरम्यान, पाकिस्तानी सीमेजवळ असलेले आदमपूर एअरबेस शत्रूवर जलद हल्ला करण्यासाठी ओळखले जाते. आदमपूर एअरबेस हा भारताच्या लढाऊ विमान मिग 29 चा तळ आहे.