सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. उष्णतेच्या या लाटेमुळे शरीराचे तापमान वाढू शकते आणि गंभीर आजार होऊ शकतात. अशा परिस्थितीत योग्य काळजी न घेतल्यास उष्माघात, डिहायड्रेशन आणि उष्णतेशी संबंधित त्रास होण्याची शक्यता असते. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि गरोदर महिलांसाठी हा काळ अधिक धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. योग्य आहार, भरपूर पाणी आणि सावधगिरी यामुळे आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो.
‘हे’ करा :
जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्या, तुम्हाला तहान लागली नसली तरीही. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन (ओआरएस) वापरा. लिंबू पाणी, ताक, लस्सी आणि फळांचे रस यांसारखे घरगुती पेये प्यावे. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात.
पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे. तुमचे डोके झाकून ठेवा. थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर करावा. उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालाव्यात. रेडिओ, टीव्ही वर प्रसारित होणाऱ्या उष्णतेच्या लाटेबाबत बचाव उपायावर लक्ष द्या आणि स्थानिक हवामान बातम्यांसाठी वर्तमानपत्र वाचावीत.
भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) वेबसाइट https://mausam.imd.gov.in/ वर हवामानाविषयी अद्ययावत माहिती घेत रहावी. हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालवा. थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटा रोखा. दिवसा खिडक्या आणि पडदे बंद ठेवावे, विशेषतः तुमच्या घराच्या सूर्यप्रकाशाच्या बाजूला थंड हवा येण्यासाठी रात्री खिडक्या उघड्या कराव्यात. जर तुम्ही घराबाहेर जात असाल, तर तुमची घराबाहेरील कामे दिवसाच्या सकाळ आणि संध्याकाळ वेळेपर्यंत मर्यादित करावी. दिवसाच्या थंड वेळांमध्ये बाहेरील कामांचे नियोजन करावे.
संवेदनशील किंवा जास्त जोखीम असलेल्या लोकांसाठी उपाय :
कोणाला उष्णतेचा ताण आणि उष्णतेशी संबंधित आजाराचा त्रास होत असेल तर अशा लोकांना इतरांपेक्षा जास्त धोका असतो आणि त्यांच्याकडे अतिरिक्त लक्ष द्यावे. विशेषत: लहान अर्भक आणि लहान मुले, घराबाहेर काम करणारे लोक, गर्भवती महिला, मानसिक आजारपण असलेली व्यक्ती, शारीरिकदृष्ट्या आजारी, विशेषतः हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. थंड हवामानापासून ते उष्ण हवामानापर्यंतच्या प्रवाशांनी त्यांच्या शरीराला उष्णतेला अनुकूल होण्यासाठी एक आठवडा वेळ द्यावा. जास्त श्रम टाळावेत आणि भरपूर पाणी प्यावे.
इतर खबरदारी :
एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी व्यक्तींवर देखरेख ठेवले पाहिजे आणि त्यांच्या आरोग्याचे दररोज निरीक्षण केले पाहिजे. तुमचे घर थंड ठेवा. पडदे, शटर किंवा सनशेड वापरा. रात्री खिडक्या उघडा. दिवसा खालच्या मजल्यावर राहण्याचा प्रयत्न करावा. शरीर थंड करण्यासाठी पंखा, स्प्रे बाटल्या, ओलसर कापड आणि बर्फाचे टॉवेल वापरावा. पाण्यात पाय बुडवल्याने निर्जलीकरण आणि शरीराची उष्णतेमुळे होणारी अस्वस्थता कमी होऊन जलद थंडावा मिळतो.
‘हे’ करू नका :
उन्हात बाहेर पडणे टाळा., विशेषतः दुपारी 12 ते 3.00 दरम्यान. दुपारच्या वेळी बाहेर असताना कठोर परिश्रम टाळा. अनवाणी बाहेर जाऊ नका. अतिउष्ण वेळेत स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाक क्षेत्र पुरेशा प्रमाणात हवा येण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात. अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेले पेय टाळा, कारण यामुळे शरीरातील जास्त पाणी कमी होते किंवा पोटात पेटके येऊ शकतात. उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका. उभ्या केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका. वाहनातील तापमान धोकादायक ठरू शकते.
उष्णतेच्या लाटेपासून बचाव करणे आपल्या हातात आहे. योग्य उपाययोजना आणि सतर्कता बाळगल्यास आपण या तापमानवाढीच्या संकटातून सुरक्षित राहू शकतो. स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. गरमी वाढली तरी घाबरू नका. सावधगिरी बाळगा, भरपूर पाणी प्या. तापमान वाढले तरी आरोग्य अबाधित ठेवा. सजग राहा. सुरक्षित राहा..!
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली.