अमरावती, 6 मे (हिं.स.)
राज्य शासनाकडून ॲग्रिस्टॅक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ‘शेतकरी ओळख क्रमांक’ तयार करणे अनिवार्य आहे. ॲग्रिस्टॅक योजने अंतर्गत प्राप्त होणारे शेतकरी ओळख क्रमांक हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. हा शेतकरी ओळख क्रमांक जवळच्या नागरी सुविधा केंद्रातून पास होतो. शेतकरी ओळख क्रमांक असणा-या शेतक-यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल, असे विभागीय आयुक्त कार्यालयाचे अपर आयुक्त अजय लहाने यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
‘शेतकरी ओळख क्रमांक’ च्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा लाभ, पिक कर्ज, किसान क्रेडिट कार्ड, कृषि पायाभूत सुविधा निधी, शेती विकासासाठी इतर कर्ज, पिक विमा, नैसर्गिक आपती नुकसान भरपाई, किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये शेतक-यांचे नोंदणीकरण, कृषि कर्ज, दिर्घ मुदती कर्ज, खते, किटकनाशके, बि-बियाणे, कृषि अवजारे आदी योजनांचा लाभ सुलभरित्या, पारदर्शकपणे व जलदगतीने शेतकऱ्यांना प्राप्त करता येईल.
उपरोक्त प्रमाणे अनेक शासकीय योजना, सेवा, सुविधा, इत्यादींचा लाभ घेण्यामध्ये ॲग्रिस्टॅक योजने अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. अमरावती विभागातील सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक योजने अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करून घ्यावा तसेच शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करण्यासाठी कोणतीही अडचण असल्यास संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहनही विभागीय आयुक्तालयच्या वतीने करण्यात आले आहे.