Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती – एका आदर्श महिला नेतृत्वाला वंदन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती – एका आदर्श महिला नेतृत्वाला वंदन

admin
Last updated: 2025/05/30 at 5:36 PM
admin
Share
7 Min Read
SHARE

भारतीय इतिहासात मोठी युद्धे झाली, साम्राज्ये उभी राहिली आणि कोसळली. परंतु, या साऱ्या घडामोडींमध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या कार्याने समाजहित, धर्मरक्षण आणि जनकल्याण या मूल्यांना सर्वोच्च मान दिला, त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्थान अग्रभागी आहे. त्यांच्या जीवनकार्याने सिद्ध केलं की एका स्त्रीचं नेतृत्व केवळ राजसिंहासनापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकतं. अहिल्यादेवी होळकर या केवळ इंदूरच्या होळकर घराण्याच्या राणी नव्हत्या तर त्या एक द्रष्ट्या प्रशासक, न्यायप्रिय नेत्या, धर्मपरायण समाजसुधारक आणि स्त्री सक्षमीकरणाच्या आद्य पुरस्कर्त्या होत्या. त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त, त्यांचे स्मरण त्यांच्या विचारांमधून नव्याने प्रेरणा घेण्याचे निमित्त आहे.

प्रशासन आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नेतृत्व केवळ राज्यकारभारापुरते मर्यादित नव्हते, तर त्यात धर्म, न्याय, लोकसेवा आणि नीतीमूल्यांचे सखोल अधिष्ठान होते. त्यांनी महेश्वरला आपली राजधानी बनवली. ही राजधानी एक आदर्श प्रशासनाचे प्रमाण होते. येथे अहिल्यादेवींनी एक पारदर्शक, न्यायपूर्ण आणि लोकाभिमुख राज्यकारभार चालवला. तेव्हाच्या काळात एक राणी प्रत्यक्षपणे जनतेच्या तक्रारी ऐकून त्यावर तत्काळ निर्णय घेते, अशी कल्पनाही करवत नाही. पण अहिल्यादेवी दररोज प्रजेसोबत संवाद साधत, त्यांच्या अडचणी समजून घेत आणि न्याय देत. हे त्यांचे कार्य आजच्या लोकशाही व्यवस्थेलाही मार्गदर्शक ठरावे असेच आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य धार्मिक स्थळांचे पुनरुज्जीवन आणि समाजकल्याण यासाठी वाहिले. काशी विश्वनाथ, गंगाघाट, रामेश्वरम, सोमनाथ, द्वारका अशा अनेक प्राचीन आणि पवित्र स्थळांचे जीर्णोद्धार करून त्यांनी भारतीय सांस्कृतिक एकात्मतेचे धागे पुन्हा मजबूत केले. याशिवाय देशभर त्यांनी शेकडो धर्मशाळा, घाट, कुंड, विहिरी, अन्नछत्रे आणि विश्रामगृहे उभारली. हे कार्य कोणत्याही जाती-धर्माचा भेद न करता सर्वसामान्य जनतेसाठी केले गेले. त्यांच्या या पुढाकारामुळे हजारो लोकांना निवारा, अन्न आणि आधार मिळाला. त्यांचे हे सामाजिक कार्य आजही संपूर्ण भारतात “लोककल्याणकारी राज्यशासनाचा” आदर्श नमुना मानले जाते. प्रशासन आणि समाजकारण यांचा असा सुरेख मिलाफ क्वचितच इतिहासात पाहायला मिळतो आणि त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर!

स्त्री सक्षमीकरणाचे आदर्श!

अठराव्या शतकातील भारतात स्त्रियांना घराच्या चार भिंतींपलीकडे जाण्याची मुभा नव्हती. पण अशा काळातही अहिल्यादेवी होळकर यांनी स्त्रिया आत्मनिर्भर बनाव्या यासाठी पुढाकार घेतला. त्या काळात त्यांनी सुरू केलेला महेश्वरी साडी उद्योग केवळ व्यवसाय नव्हता तर तो एक सामाजिक क्रांतीचा भाग होता. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी काशी आणि इतर ठिकाणांहून कुशल विणकरांना महेश्वरला बोलावले. त्यांनी स्थानिक महिलांना हातमाग प्रशिक्षण दिले, आणि महिलांना घरोघरी बसून उत्पन्न मिळवण्याची संधी निर्माण केली. या उद्योगाने हजारो महिलांना केवळ रोजगारच दिला नाही, तर स्वाभिमान, ओळख आणि आत्मसन्मानही दिला. आजही महेश्वर व आसपासच्या भागात महेश्वरी साड्या विणणाऱ्या हजारो महिला पहायला मिळतात.

या साड्या केवळ पारंपरिक पोशाख नाहीत, तर त्या अहिल्यादेवींच्या द्रष्ट्या धोरणांचा आणि स्त्रीसन्मानाच्या तत्त्वांचा वस्त्ररूप अविष्कार आहेत. त्यांनी कोणत्याही जाती, धर्म, वर्ग यांचा भेद न करता सर्वांसाठी कार्य केले. १३ ऑगस्ट १७९५ रोजी या महान राणीने देहत्याग केला. धर्मशाळा, भजनमंडळे, सार्वजनिक पाणवठे आणि शिक्षणाच्या सुविधा त्यांनी महिलांसाठी खुल्या केल्या. त्या काळात जेव्हा स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान होते, तेव्हा त्यांनी महिलांना धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची मुभा दिली. अहिल्यादेवींच्या या कार्यामुळेच त्यांना ‘पुण्यश्लोक, ‘लोकमाता’ आणि ‘राजमाता’ अशा सन्मानार्थ उपाधी प्राप्त झाल्या. केंद्र शासनाने त्यांच्या स्मृतींना वंदन म्हणून टपाल तिकीट प्रकाशित करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला आहे. इ.स. १७६७ साली त्यांनी महेश्वर येथे हातमाग उद्योग सुरू करून एक स्थायिक, गुणवत्ताधिष्ठित आणि बाजारपेठेचा विचार करणारा स्थानिक उद्योग उभारला. यामागील हेतू होता तो स्त्रियांना उपजीविकेचा मार्ग उपलब्ध करून देणे आणि महेश्वरला धार्मिक व पारंपरिक वस्त्रकलेचे केंद्र बनवणे. महेश्वरी साडी आणि अहिल्यादेवी यांचे नाते केवळ वस्त्रनिर्मितीपुरते मर्यादित नाही, तर ते महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक वारसा आणि स्थानिक उद्योगाचा उत्कर्ष यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे.

महेश्वरी साड्यांची क्रेझ आजही कायम !

• महेश्वरी साड्या हलक्या आणि देखण्या

• सूती किंवा सिल्क-कॉटन मिश्र धाग्यांपासून तयार होतात, त्यामुळे साडी नेसण्यास हलकी

• साड्यांची किनारी (पट्टा) (झरी पट्टा) अतिशय आकर्षक आणि पारंपरिक नक्षीकामाने सजलेली

• “रिर्व्हसिबल बॉर्डर” म्हणजेच दोन्ही बाजूंनी वापरता येणारी साडी ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट

• भारतातच नाही तर विदेशात ही प्रसिद्ध

• हस्तकला आणि महिला उपयोजनता याचे प्रतीक

• पारंपारिक पण मोहक रंगसंगती गडद जांभळा, हिरवा, पिवळा, राखाडी यांसारखे रंग

अहिल्यादेवींनी त्याकाळी फक्त उद्योग उभारला नाही, तर महिलांना कामात समाविष्ट करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवले. आजही महेश्वर येथील अनेक महिलांचे कुटुंब महेश्वरी साड्या विणण्यावर आधारित आहे. महेश्वरी साडी म्हणजे केवळ एक पारंपरिक वस्त्र नाही, तर ती आहे अहिल्यादेवींच्या दूरदृष्टीची, सामाजिक जाणिवेची आणि स्त्री सन्मानाच्या विचारांची एक जिवंत आठवण म्हणता येईल.

‘स्टार्टअप’ महिला उद्योजिकांसाठी प्रेरणास्रोत!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशतकी जन्मजयंती साजरी करताना त्यांच्या दूरदृष्टीने घडवलेल्या उपक्रमांचा आजच्या काळातही प्रभाव दिसतो. महेश्वरी साडी उद्योग हे त्याचे अत्यंत प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी स्थापलेला हा स्थानिक उद्योग आजही महिला सक्षमीकरणाचा आदर्श मॉडेल मानला जातो. त्यांच्या विचारांतून निर्माण झालेल्या या व्यवसायाचे स्वरूप केवळ आर्थिक नव्हते, तर ते सामाजिक समावेश, कौशल्यविकास आणि स्वावलंबनाच्या मूल्यांवर आधारित होते. आज अनेक स्वयंसेवी संस्था आणि शासनाच्या योजनांद्वारे महेश्वरी साडी उद्योगातून ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. अहिल्यादेवींच्या कार्यातून मिळणारा मूलभूत धडा म्हणजे – कोणताही व्यवसाय फक्त नफा मिळवण्यासाठी नसावा, तर तो समाजातील दुर्बल घटकांना सक्षम करण्याचे साधन असावे. त्यांची ही दूरदृष्टी आजच्या स्टार्टअप महिला उद्योजिकांसाठी मार्गदर्शक ठरते.

महिला उद्योजिकांनी सामाजिक संवेदना, स्थानिक कौशल्यांचा विकास आणि सांस्कृतिक मूल्यांचा समावेश करताना, व्यवसाय कसा दीर्घकालीन आणि समर्पित बनवावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे अहिल्यादेवींचा साडी उद्योग.

आज महेश्वरी साडी जगभरात प्रसिद्ध आहे, पण तिच्या प्रत्येक धाग्यामागे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्वप्न, दूरदृष्टी आणि स्त्रीच्या सन्मानासाठी दिलेले योगदान विणलेले आहे.

या ऐतिहासिक वारशाला आदरांजली वाहत, राज्य शासनाने ६ मे २०२५ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडी (जि. अहिल्यानगर) येथे विशेष मंत्रिमंडळ बैठकीत महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी “आदिशक्ती अभियान” राबविण्याचा निर्णय घेतला. या अभियानाचा उद्देश म्हणजे महिलांना आरोग्य, पोषण, शिक्षण, आर्थिक सबलीकरण, सामाजिक सहभाग आणि नेतृत्व विकासाच्या माध्यमातून सशक्त करणे आहे. तसेच बालमृत्यू व मातामृत्यू कमी करणे, महिलांचा पंचायतराजमध्ये सहभाग वाढवणे, बालविवाह व कौटुंबिक हिंसाचारास प्रतिबंध करणे, अशा अनेक महत्त्वपूर्ण बाबी यामध्ये समाविष्ट आहेत.

ग्रामपातळीपासून राज्यस्तरापर्यंत विशेष समित्या स्थापन करून त्यांचे वार्षिक मूल्यमापन केले जाईल. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समित्यांना “आदिशक्ती पुरस्कार” देण्यात येणार असून, हे पुरस्कार दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित होतील. या उपक्रमासाठी दरवर्षी अंदाजे १०.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या अभियानाचे मूळ बीज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांमध्येच आहे. स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधार नसून, ती समाजाच्या पुनर्बांधणीची शक्ती आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राबवले जाणारे ‘आदिशक्ती अभियान’ हे स्त्रीसन्मान, स्त्रीसशक्तीकरण आणि सामाजिक परिवर्तनाचे आधुनिक रूप आहे.

वर्षा फडके-आंधळे, उपसंचालक (वृत्त)

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक
Next Article राज्य, धर्म व भाषेपेक्षा अधिक मातृभूमीचा अभिमान बाळगावा – राज्यपाल

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?