नागपूर, 12 जून (हिं.स.) : राहुल गांधी यांना त्यांचाच पक्ष गांभीर्याने घेत नाही. पंतप्रधानांना कुणीही पत्र पाठवू शकतो. परंतु, त्याबद्दल बोलणे आवश्यक वाटत नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. नागपुरात गुरुवारी भाजप सरकारला 11 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी नागपुरात पत्रकार परिषद घेतली, यावेळी गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील एनडीए सरकारच्या कामगिरीबद्दल सांगितले. तसेच, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्राबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आपले मत मांडले.
राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधानांना पत्र लिहून वंचित समाजातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत होणाऱ्या विलंबाकडे लक्ष वेधले. पंतप्रधान मोदींना पत्र लिहून हा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी यांनी दलित, एसटी, ईबीसी, ओबीसी आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या निवासी वसतिगृहांची स्थिती अत्यंत दयनीय असल्याचे म्हटले आहे. वंचित वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीला होणारा विलंब दूर करण्याचे आवाहन राहुल यांनी केलेय.
राहुल यांच्या पत्राबद्दल गडकरींना विचारले असता ते म्हणाले की, त्यांचाच पक्ष राहुल गांधींना गांभीर्याने घेत नाही. मला याबद्दल काहीही बोलण्याची गरज नाही. लोकशाहीत कोणीही पंतप्रधानांना पत्र लिहू शकते. पण, राहुल गांधींच्या प्रत्येक मुद्द्यावर भाष्य करणे योग्य वाटत नसल्याचे गडकरी यांनी सांगितले. दरम्यान गडकरी यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 11 वर्षांच्या कामगिरीचे कौतुक केले. गडकरी म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप आणि एनडीए सरकारची 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा कार्यकाळ बदललेल्या देशात बदललेल्या सरकारचे नाही तर बदललेल्या युगाचे प्रतीक आहे. या कार्यकाळात, आपल्या देशाच्या समृद्धी, सुरक्षा, सामाजिक सौहार्द आणि सांस्कृतिक अभिमानाच्या चारही आयामांमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व क्रांतिकारी बदल घडले आहेत असे गडकरींनी सांगितले.