दाखवले रंग! उडविले रंग! पिचकारीतून उडाले ‘राज-रंग!!!’
सोलापूर जिल्ह्यात ‘रंगपंचमी’त नेतेमंळींचं धुववडीचं धुमशान
शिवाजी भोसले
सोलापूर : रंगपंचमीचा प्रचंड उत्साह बुधवारी (ता.19) सोलापूर शहर-जिल्ह्यात बघायला मिळाला.धुलिवंदनापासून सुरु झालेल्या वसंतोत्सवाला आज रंगपंचमी दिवशी पाच दिवस झाले.एकमेकांना वेगवेगळे रंग लावून सण साजरा झाला. विविध रंगांची उधळण होताना प्रचंड उत्साह अन् चैतन्य दिसून आले. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर वावरणार्या जिल्ह्यातील राजकारण्यांनी रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला आणि प्रत्यक्ष रंगपंचमीदिवशी चांगलेच रंग उधळले.त्यातून विरोधकांचा बेरंग होण्याची वेळ आली. रंगपंचमीतच जणू काही धुळवड खेळल्याचा फिल आला.आपल्या गॉडफादरांनी जे रंग उधळले, जे रंग लावले त्याने त्यांच्या खास समर्थकांना मात्र चांगल्या गुदगुल्या झाल्या. त्यावर रंग उधळणार्या गॉडफादरांनाही पिचकारीची धार योग्य ठिकाणी गेल्याचा आसूरी आनंददेखील झाला असावा. जिल्ह्यातील राजकारण्यांनी रंगपंचमीचे औचित्य साधून कसे रंग उधळले यापेक्षा ‘रंग’ दाखवले? ‘रंगपंचमी’त नेतेमंडळींच्या ‘धुळवडी’चं धुमशान कसं झालं? यासंदर्भात दैनिक ‘सुराज्य’च्या लाडक्या वाचकांनासाठी घेतलेला हा धांडोळा…
———++
‘ताई’च्या लालबुंद चेहर्यावर ‘राजकीय’ रंग;
‘जहरी टिके’चे रंग उधळताना भात्यातून निघाल्या ‘काँग्रेशी’ पिचकार्या
रंगपंचमीच्या दिवशी खासदार प्रणिती शिंदे दिल्लीच्या संसदेत होत्या. अगोदरच लाल बुंद असलेल्या ताई प्रसारमाध्यमांद्वारे विरोधकांना ‘आक्षेपा’चे रंग लावताना अधिकच लालबुंद झाल्याचं बघायला मिळालं. ‘विरोधी’ रंग लावताना महाराष्ट्रात सामाजिक संतुलनाचा कसा ‘बेरंग’ होतोय हे त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर त्यांनी ‘काळ्या’रंगाची फुली ओढली. सत्ताधारी भाजपला आक्षपाचे रंग फासताना त्यांनी “जैसे राक्षसों को खून की जरुरत पडती है,वैसे ही बीजेपी को दंगो की जरुरत पडती है, ये लोग महाराष्ट्र का सामाजिक संतुलन बिगाडाना चाह रहे है’ असे आरोप लावत भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जहरी टिकेचे रंग उधळले.
चौकट
जयाभाऊंच्या रंगाचा ‘बेरंग’ होणं टळलं;
पालकमंत्र्यांनी रंगपंचमीत ‘अब शांती शांती’ म्हटलं!
एका गंभीर प्रकरणानं पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या रंगाचा ‘बेरंग’ होण्याचं मुख्यमंत्र्यांमुळं टळलं. फडणवीसांबरोबरची ‘दिली, दोस्ती अन् दुनियादारी ’ त्यात भारी पडली. प्रकरण निस्तारता निस्तारत नाकीनाऊ येण्याची पाळी आलेल्या जयकुमार गोरेंनी राजकीय पटलावर प्रत्येक आघाडीवर आपले ‘रंग’ दाखवले खरे पण यंदाच्या रंगपंचमीत ‘अब शांती शांती’ असा सूर आळवल्याचा त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये बोलबाला झाला.
———–
सोपलांनी ‘लक्षवेधी’चा रंग विधानसभेत उधळला;
बार्शीत विरोधकांमध्ये खळबळीचा ‘बेरंग’ उडला
कट्टर राजकीय दुष्मनीचे रंग सदासर्वकाळ उडविणार्या आमदार दिलीप सोपल यांनी रंगपंचमीच्या आदल्यादिवशी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीचा रंग उधळला. सत्ताधारी असताना माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी केलेल्या बेकायदा कामांवर सोपल यांनी आक्षेपाच्या रंगाच्या पिचकार्या उडविल्या. बार्शीत खासगी जागांवर नगरपरिषदेच्यावतीने बांधकामे कशी केली? असा ‘वकिली पाईंट’ रंग त्यांनी उडवला? याप्रकरणी मंत्री उदय सामंतांना ’कारवाईचे’ रंग उडवू असं उत्तर देणं भाग पडलं. सोपलांच्या लक्षवेधी रंगानं बार्शीत विरोधकांमध्ये ‘खळबळ’ उडण्याचा बेरंग झाला.
—————
खरे-पाटील ‘श्रेयवादा’च्या रंगपंचमीत ‘चिंब चिंब’;
जनतेला मात्र पाणी मिळण्याच्या ‘आनंदी रंगात’ स्वारस्य
मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून मीच निधी मिळवून आणला, असं सांगत आमदार राजू खरे आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या तु…तु…मैं…मैं..चा रंग उधळणं सुरु आहे. श्रेयवादाचे रंग उधळण्यात दोघांना स्वारस्य आहे. मात्र तालुक्याती जनतेला श्रेयवादाचे रंग अंगावर घेण्यात अजिबात स्वारस्य नाही.आष्टी योजनेतून शेतीला मिळणार्या ‘पाण्याचा आनंद’ उडविण्यात जनतेला स्वारस्य आहे. त्यामुळे खरे अन् पाटलांच्या श्रेयवादाचे रंग उधळण्याकडे तालुक्यावासियांनी दूर्लक्ष केलंय.
—————
पाटील, सातपुते, परिचारकांनी उडविले ‘निराशेचे काळे’ रंग
विधान परिषदेच्या आमदारकीचे सिंहासन मिळवून ‘आनंदाचे डोई आनंद तरंग’ असे जल्लोषी रंग उडवून हवा करण्याच्या नादात असलेल्या उमेश पाटील, प्रशांत परिचारक, राम सातपुते आणि शहाजी पाटील यांचा भ्रमनिराश झाला. त्यातून त्यांनी जणू काही निराशेचे काळे रंग उडवत काळी रंगपंचमी साजरी केली असावी. उमेश पाटील आणि प्रशांत परिचारक यांच्या कट्टर समर्थकांनी तर आमदारकी न मिळाल्याबद्दल ‘खदखदी’चे रंग दाखविताना बघून घेण्याच्या दमबाजीचे आव्हानाचे झेंडे फडकावले.
————-
चंद्रभागेच्या ‘अपावित्र्या’चे सभागृहात रंग;
‘पावित्र्या’च्या निर्मळ पाण्याचे तरंग उडविण्याचा जिगरबाज अट्टाहास
दक्षिणकाशी पंढपुरातील चंद्रभागा नदीच्या ‘अपवित्र’ होत असलेल्या दुषित पाण्याबद्दलचे रंग आमदार राजू खरे, समाधान अवताडे आणि अभिजित पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उधळले. मुख्यमंत्र्यांच्या दिशेने हे रंग गेल्यानंतर त्यांनी या सबंधी स्वतंत्र बैठक लावून कार्यवाही करण्याचे आदेश दिले. चंद्रभागेच्या पवित्र आणि निर्मळ पाण्याचे तरंग उडविण्यासाठी या तिघा आमदारांनी कर्तव्य आणि जबाबदारीचे रंग केवळ पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यालाच नव्हे, तर महाराष्ट्राला दाखवून दिले.
————
सचिनदादांनी ‘वट्ट’ असण्याचे दाखविले रंग,
बाजार समितीत कल्याणशेट्टी-निंबाळकरांनी उडविला ‘राज’रंग
अवघ्या 12 दिवसांपूर्वी मोहन निंबाळकर यांचं बाजार समितीमधील ‘राज’ काढून घेण्यात आलं होतं. मात्र आमदार सचिन कल्याणशेट्टींनी आपला ‘वट्ट’ दाखविण्याचे रंग प्रशासनात उधळले. त्यातून निंबाळकरांना बाजार समितीत पुन्हा आणले. समितीत आता कल्याणशेट्टी अन् निंबाळकर यांचे ‘राज-रंग’ उधळलेले दिसतील. निंबाळकर पुन्हा आल्याने अतृप्त आत्म्यांवर निषेधाचे काळे रंग उधळण्याची पाळी आली.
————–
पिचकारीत जय-पराजयाचे रंग;
पण संजयमामांच्या नशिबी आता कोणता रंग?
करमाळा विधानसभेला पराजयाचा रंग चाखावा लागलेल्या माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पिचकारीत ‘जय-पराजय’ असे दोन्ही ठासून रंग भरलेत. अशातच आदिनाथच्या निवडणुकीत मैदानात उतरून कारखान्यावर सत्ता आणण्याच्या ‘हिमती’चे रंग दाखविण्याचा घाट त्यांनी घातला. मात्र, या निवडणुकीत ते विजयाचा की पराभवाचा रंग उधळणार? याचं उत्तर येणार्या काळाकडे असेल.