अहमदाबाद, 10 एप्रिल (हिं.स.)।गुजरात टायटन्स संघाने आपल्या घरच्या मैदानावर राजस्थानचा ५८ धावांनी पराभव करत दमदार विजय मिळवला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २१७ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती, ज्यामध्ये साई सुदर्शनच्या खेळीचं मोठं योगदान आहे. दरम्यान त्याने या सामन्यात साई सुदर्शनने इतिहास रचला आहे. साई सुदर्शनने एकाच आयपीएल मैदानावर सलग पाच वेळा ५० पेक्षा जास्त धावा करत पहिला भारतीय फलंदाज बनण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर, साई सुदर्शनने २०२४ मध्ये ५० पेक्षा जास्त धावांचे सलग दोन डाव खेळले. त्यानंतर, या वर्षीही त्याने याच मैदानावर सलग तीन वेळा ५० पेक्षा जास्त धावांचा डाव खेळला आहे. त्यामुळे एकाच आयपीएल मैदानावर सलग पाच वेळा ५० पेक्षा जास्त धावा करणारा साई सुदर्शन हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.यापूर्वी कोणत्याही भारतीय फलंदाजांनी अशी कामगिरी केली नाही, ते आता साई सुदर्शनने करून दाखवलं आहे. २०१८ ते २०१९ दरम्यान आरसीबीकडून खेळताना एबी डिव्हिलियर्सनेही असाच पराक्रम केला होता.
साई सुदर्शनने यावर्षी अहमदाबादमध्ये पंजाब किंग्जविरुद्ध ७४ धावांची शानदार खेळी केली. यानंतर, त्याने याच मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध ६३ धावांची शानदार खेळी केली होती. तो आरसीबीविरुद्ध ४९ धावांवर बाद झाला होता, पण हा सामना बंगळुरूमध्ये खेळवण्यात आला. यानंतर, हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध तो फक्त ५ धावा करू शकला. पण तो पुन्हा अहमदाबादला परतताच त्याने शानदार खेळी केली होती.