अमरावती, 13 जून, (हिं.स.) शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन प्रहार नेता बच्चूभाऊ कडू यांचे मोझरी येथे गेल्या पाच दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरु आहे.आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. या दरम्यान त्यांची प्रकृती खालावली असल्याने सर्वपक्षीय स्तरावर त्यांचे उपोषण सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. दरम्यान आज शुक्रवार दिनांक १३ जून रोजी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आ.संजय खोडके व अमरावतीच्या लोकप्रतिनिधी आ. सुलभा खोडके यांनी मोझरी येथे बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलन उपोषण मंडपाला भेट दिली.
यावेळी आ.संजय खोडके यांनी उपोषणकर्ते बच्चू कडू व त्यांच्या समर्थकांशी चर्चा केली. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सुद्धा बच्चू कडूंच्या प्रकृतीची विचारणा करण्यात आली असून अशा शेतकऱ्यांच्या लढवय्या नेत्याची अमरावती जिल्ह्याला खरंच गरज आहे. त्यामुळे त्यांनी शेतकरी प्रश्नी आंदोलनाचा लढा सुरूच ठेवावा, परंतु प्रकृतीचा विचार करता उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती आ.संजय खोडके यांनी केली.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना आ. सुलभा खोडके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन सुरु असलेल्या बच्चूभाऊंच्या लढ्यात आपण सहभागी असल्याचे सांगितले. मात्र, उपोषणाचा मार्ग न अवलंबता आपण शासन दरबारी व मंत्रालय स्तरावर आंदोलन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देऊ. उपोषण सुटले तरी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु राहील, परंतु बच्चूभाऊंनी उपोषणाचा आग्रह सोडावा , आणि आपल्या प्रकृतीचा विचार करून आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन आ. खोडके यांनी केले.
मंत्र्यांनी घेतली ऑनलाईन बैठक
बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, दिव्यांग, विधवा महिलांना ६ हजार रुपये मानधन तसेच वंचित घटकांचे प्रश्न या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी सुरू केलेल्या या आंदोलनाला राज्यभरातून अनेक नेते मंडळींनी पाठिंबा दिला आहे. अनेकांनी त्यांची भेट देखील घेतली आहे. हे आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारकडून प्रयत्न देखील केले जात आहेत. मंत्री भरत गोगावले, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री जयकुमार गोरे यांनी बच्चू कडू यांच्या मागण्यांसंदर्भात ऑनलाईन बैठक घेतली. परंतु, या बैठकीत ठोस आश्वासन मिळाले नसल्याने बच्चू कडू उपोषणावर ठाम आहेत.