मुंबई : ‘मी डोनाल्ड ट्रम्प नाही. मी माझ्या माणसांना तळमळताना पाहू शकत नाही,’ असे भावनिक उदगार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन संदर्भातील एका प्रश्नावर बोलताना काढले आहेत. खासदार संजय राऊत यांनी बहुचर्चित शरद पवारांच्या मुलाखतीनंतर मुख्यमंञी ठाकरेंची मुलाखत घेत आहेत. येत्या २५ व २६ जुलै रोजी ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे.
मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’साठी एक मॅरेथॉन मुलाखत दिली आहे. या मुलाखतीबद्दल शिवसेनेचे खासदार व ‘सामना’चे कार्यकारी संपादक राऊत यांनी आज एक व्हिडिओ ट्विट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिलखुलास मुलाखत असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी सामनासाठी अनेकदा मुलाखती दिल्या आहेत. माञ राज्याचे मुख्यमंञी म्हणून पहिल्यादाच मुलाखत देत आहेत.
गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील जनतेला सतावणाऱ्या लॉकडाऊनच्या समस्येवर मुख्यमंत्री ठाकरे या मुलाखतीत सविस्तर बोलले आहेत. लॉकडाऊनला लोक कंटाळले आहेत, असं त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी लॉकडाऊनची गरज पटवून दिली आहे. ‘मी कोरोनासोबत जगायला शिकलो आहे. सगळ्यांनीच शिकायला पाहिजे. शहाणे व्हायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपण प्रयत्न करतो आहेत,’ असं त्यांनी म्हटलं आहे. ‘मी डोनाल्ड ट्रम्प नाही. मी माझ्या माणसांना तळमळताना पाहू शकत नाही,’ असंही त्यांनी पुढं म्हटलं आहे.
मुंबईच्या रस्त्यावर वडापाव कधी मिळणार, या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी दिलं आहे. ‘लॉकडाऊन आहेच. त्यामुळंच याच्यानंतर काय होणार, त्याच्यानंतर काय मिळणार याला अर्थ नाही. आपण एकेक गोष्ट सोडवत चाललो आहेत,’ असं त्यांनी म्हटलं आहे. ‘सरकार म्हणून मी काही गोष्टी जरूर करणार. मला एखादी गोष्ट पटली तर ती करताना मी टीकेची पर्वा कधीच करत नाही. परीक्षा व्हाव्यात असं माझंही मत आहे, पण…’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
तुमच्या डोक्यावरचे केस कमी झालेले दिसतात, हा सहा महिन्यांचा परिणाम आहे का? सरकारच्या सहा महिन्याच्या काळाकडं तुम्ही कसं पाहता? मुंबईच्या रस्त्यावर वडापाव कधी मिळणार? महाराष्ट्रात सैन्याला पाचारण करावं असं आपल्याला कधी वाटलं होतं का? कोरोनाच्या काळात आपण मंत्रालयात कमीत कमी गेलात, असं का? अंतिम वर्षाच्या परीक्षेचं काय?,’ असे अनेक प्रश्न या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आले आहेत. त्यावर त्यांनी नेमकी काय उत्तरं दिली आहेत, हे प्रत्यक्ष मुलाखतीतून समजणार आहे.