पुणे, 16 जून (हिं.स.) : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही भटक्या विमुक्त समाजातील नागरिक सरकारी योजनांपासून कोसो दूर आहेत. पाठीवर बिऱ्हाड आणि हातावरच पोट असलेल्या या नागरिकांना त्यांचाच ठाव ठिकाणा माहिती नसतो. त्यामुळे सरकारी कागदपत्रांच्या जाचक नियमापासून ते दूरच असतात. म्हणूनच त्यांच्यापर्यंत सरकारी योजना पोहोचविण्यासाठी भटके विमुक्त विकास परिषद आणि भारतीय सिकलीकर संघटना प्रयत्नशिल आहेत. नुकतेच त्यांनी तब्बल ५५० सिकलीकर वैदू आणि मांगगारुडी समाजातील नागरिकांना जातीच्या दाखल्याचे वाटप केले आहे. राजे उमाजी नाईक महाराज स्वाभिमान योजनेअंतर्गत भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले.
या वेळी हडपसरचे मंडलाधिकारी शेखर शिंदे, परिषदेच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य शुभांगी तांबट, परिषदेचे हितरक्षा प्रमुख डॉ. जितेंद्र ठाकूर, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रवक्ते अभिजीत बोराटे, सिकलीकर संघटनेचे अध्यक्ष चांदसिंग कल्याणी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांनी भारतमाता, महाराजा रणजीतसिंग, राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रामुख्याने भटके विमुक्त समाजातील सिकलीकर वैदू व मांगगारुडी समाजातील ५५० नागरिकांना जातीचे दाखले मंडल अधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले.
समाजातील होतकरू आणि दुर्लक्षित घटकाला जातीचे दाखले उपलब्ध केल्याबद्दल चांदसिंग कल्याणी यांनी प्रशासनाचे आभार मानले. तसेच संघटनेचे शक्तिसिंग कल्याणी यांनी येणाऱ्या काळामध्ये जातीच्या दाखलांचा फायदा कसा होईल, याची माहिती दिली शुभांगी तांबट यांनी परिषदेचे काम कसे चालते याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाला नगरसेवक मारुती तुपे, गुरूद्वारा गुरुनानक दरबार साहिबचे प्रधान चरंजीतसिंग सहानी, डॉ. जितेंद्र ठाकुर, पालावरची शाळांच्या शिक्षिका आदि उपस्थित होते. भगतसिंग कल्याणी यांनी आभार मानले. —————