डोंबिवली, २९ मे (हिं.स.) : “हिंदू धर्माबाबत सावरकरांची मते वेगळी होती, पण राष्ट्रहितासाठी त्यांनी क्रांतीचे विचार रुजवले. त्यामुळे असा अलौकिक प्रतिभावान पुरुष सहस्त्रामध्ये एकदाच जन्माला येतो, असे विशेषोद्गार महंत सुधीर दास यांनी काढले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, डोंबिवली विभागातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती बुधवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी, अभ्यासक आणि प्रथितयश वक्ता पार्थ बावस्कर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष
श्रीनिवास कुलकर्णी, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, डोंबिवली अध्यक्ष शशांक खैर उपस्थित होते.
पुढे महंत पाकिस्तानवर टीका करताना म्हणाले, “पाकिस्तान हे नाठाळ राष्ट्र आहे, तो सुधारणार नाही. अशा वेळी देशाला सावरकरांच्या विचारांची गरज आहे. देशावर जेव्हा हल्ले होतात, तेव्हा सत्याग्रह करून चालत नाही.”
सावरकर अभ्यासक पार्थ बावस्कर यांनी सावरकरांविषयी पसरवल्या जाणाऱ्या अपप्रचारावर टीका केली. “सावरकरांना ‘माफीवीर’ ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र सावरकरांचा खरा इतिहास समोर आणणे ही आजची गरज आहे.” त्यांनी अंदमानमधील सावरकरांनी भोगलेल्या हाल अपेष्टांचा आणि त्यागाचा उल्लेख करत ‘हिंदुत्व’ ही त्यागातून निर्माण झालेली संकल्पना असल्याचे सांगितले. “हिंदुत्व म्हणजे काय, हे प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना समजावून सांगावे,” असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान ऑपरेशन सिंदूरमधील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जावे, यासाठी सह्यांची मोहीमही राबविण्यात आली.
—————