हिंगोली, 8 एप्रिल (हिं.स.)।सन 2007-08 पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा ही मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली यांच्यामार्फत राबविली जात आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रजेची जोपासना, तसेच त्यांचे 12 वीपर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा हेतू आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते, शिष्यवृत्ती इयत्ता 9 वी ते 12 वीपर्यंत (चार वर्षांसाठी) मिळते. सन 2017-18 पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा एक हजार रुपये तर वार्षिक 12 हजार रुपये आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत दि. 22 डिसेबर, 2024 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्याथ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी दि. 7 फेब्रुवारी, 2025 रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती, विद्यार्थ्यांना, पालकांना शाळेमार्फत जात, दिव्यांगत्व, जन्म दिनांक याबाबतची दुरुस्ती असल्यास दि. 18 फेब्रुवारी, 2025 पर्यंत परिषदेकडे ऑनलाईन पाठविण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या. विद्यार्थी व पालकांनी शाळेमार्फत पाठविलेल्या दुरुस्तींचा विचार करुन शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी मंगळवार, दिनांक 1 एप्रिल, 2025 रोजी जाहीर करण्यात आली आहे.
दि. 22 डिसेंबर, 2024 रोजी घेण्यात आलेल्या एनएमएमएस परीक्षेसाठी 2 लाख 48 हजार 758 विद्यार्थी नोंदविण्यात आले होते. या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी 11 हजार 682 शिष्यवृत्ती कोटा शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून निश्चित केलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. तसेच संबंधित संवर्गात दिव्यांगांसाठी 4 टक्के आरक्षण समाविष्ट आहे. सर्व जिल्ह्यांसाठी स्वतंत्रपणे इयत्ता 7 वी व 8 वी ची विद्यार्थी संख्या व 12 ते 14 वयोगटातील संख्येच्या आधारे जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आलेला आहे. याबाबतची निवड यादी व गुण यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://mscenmms.in/ या संकेतस्थळावर मंगळवार, दिनांक 1 एप्रिल, 2025 पासून पाहण्यास उपलब्ध आहे.
या परीक्षेचा निकाल व निवड यादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध करुन दिली जाते. जिल्ह्यांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घ्यावयाचा आहे. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व शिक्षण संचालक (योजना) यांच्यामार्फत केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी दिली आहे.