अमरावती, 4 मे (हिं.स.)
उन्हाची दाहकता वाढत असल्याने पाणीटंचाईची तीव्रता देखील दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. सद्यस्थितीत १० तालुक्यांतील ७३ गावे भीषण पाणीटंचाईचा सामना करित आहे. यामध्ये सहा तालुक्यातील ६१ गावांमध्ये टंचाई आणखी तीव्र आहे. या गावांमध्ये १८ टँकर, ३३ बोअरवेल व ५५ खासगी विहिरींव्दारे पाणीपुरवठा केल्या जात आहे.
जिल्ह्यात दरवर्षी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत टंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केल्या जातो. यंदा देखील संभाव्य पाणीटंचाईतील ७०७ गावांकरिता १०३४ उपाय योजना प्रस्तावित करीत १७ कोटी ३४ लाख ९९ हजारांचा आराखडा तयार केला आहे. या कृती आराखड्यातून जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ उपाय योजना केल्या जात आहे. सद्यस्थिती तापमानात मोठ्या प्रमाणात वाढहोत असताना पाणीटंचाईची दाहकता देखील वाढत आहे.
जिल्ह्यात अमरावती, भातकुली, मोर्शी, वरूड, चिखलदरा, धारणी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे व अचलपूर या दहा तालुक्यांत ७३ गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई असल्याने या गावांमध्ये प्रशासनाकडून आता उपाय योजना सूरू आहे. येथे १८ टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू असून ५५ खासगी विहिरी अधिग्रहितकरण्यात आल्या आहेत. याशिवाय ३३ बोअरवेल खोदण्यात आली आहेत. यामध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सर्वाधिक १९ गावांमध्ये पाणी टंचाई आहे. या पाठोपाठ चिखलदरा तालुक्यात १३, मोर्शी ९, धारणी ८, अमरावती, चांदूर रेल्वे प्रत्येकी ६, भातकुली १, अचलपूर ४, व वरूड तालुक्यातील दोन गावांमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.