मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकून भारताचा क्रिकेट संघ मायदेशी परतला. यावेळी मुंबई विमानतळावर परतलेल्या खेळाडूंना क्वॉरन्टाईनच्या नियमातून वगळण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि एमसीएचे सदस्य शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर ऑस्ट्रेलियातून परत आलेल्या टीम इंडियाला क्वॉरन्टीनच्या नियमातून सूट मिळाल्याचं समोर आलं आहे.
आज गुरुवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ मुंबई विमानतळावर परतले. परंतु मुंबईत परतलेल्या खेळाडूंसाठी क्वॉरन्टीनचे नियम शिथील करण्यात आले. कोरोनाच्या नियमामुळे विमानतळावर चाहत्यांना गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे यावेळी फक्त पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केलं. ज्याच्या नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली, त्या अजिंक्य रहाणेच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी विमानतळावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.
खेळाडूंना विलगीकरणात न ठेवण्याबाबत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत फोन केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियातून विजय मिळवून मुंबईत परतलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंना विलगीकरणात न ठेवण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश महापालिकेला दिले. त्यानुसार खेळाडूंची आरटीपीसीआर टेस्ट करुन त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
टीम इंडियाचे पुढचे सामने चेन्नईला होणार आहेत. त्याआधी खेळाडूंना कुटुंबासमवेत काही वेळ घालवायचा होता. परंतु परदेशातून आल्यामुळे नियमानुसार त्यांना क्वॉरन्टाईन करावे लागले असते. मात्र शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर खेळाडूंना क्वॉरन्टाईन न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
खेळाडूंच्या आतापर्यंत अनेकदा कोविड टेस्ट झाल्या असून त्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यांनी ब्रेक जर्नी करतानाही संपूर्ण नियमांचं पालन केलं आहे, अशी माहिती एमसीएचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिली आहे. सोबतच प्रशासनाने उत्तम सहकार्य केल्याचंही त्यांनी सांगितलं.