कोल्हापूर, 2 ऑगस्ट – कोल्हापूर-नांदणी येथील १२०० वर्षांची परंपरा असलेल्या मठातील माधुरी नावाची हत्तीण न्यायालयाच्या आदेशानंतर गुजरातमधील जामनगर येथील ‘वनतारा’ प्राणी संवर्धन केंद्रात स्थलांतरित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कोल्हापूरसह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन या प्रकरणात पक्षाची सर्व ताकद उभी करण्याची मागणी केली. त्यांच्यासोबत सहकारी जिल्हाप्रमुख वैभव उगळे, रविकिरण इंगवले आणि प्रा. सुनील शिंत्रे उपस्थित होते.
चौगुले यांनी म्हटले की, ‘पेटा’ संस्थेने न्यायालयात दिलेली माहिती अपूर्ण आणि दिशाभूल करणारी आहे. माधुरी हत्तीण ही फक्त एक प्राणी नसून लाखो लोकांच्या श्रद्धेचा, परंपरेचा आणि अध्यात्मिक नात्याचा भाग आहे. तिचे स्थानांतर ही केवळ कायदेशीर बाब नसून भावनिक वेदनेचा विषय आहे.
याआधीही कोल्हापूरच्या श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील ‘सुंदर’ नावाचा हत्ती नेण्यात आला होता. आता शेडबाळ मंदिरालाही हत्तीसंदर्भात नोटीस आल्याचे समजते. जर ही साखळी सुरू राहिली, तर पश्चिम महाराष्ट्रातील मठ-मंदिरांची परंपरा धोक्यात येईल, असे मत चौगुले यांनी व्यक्त केले.
त्यांनी पुढे म्हटले की, हिंदू मठ-मंदिरांचा हा बुरुज ढासळू नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी वैयक्तिक लक्ष घालून लोकसभा अधिवेशनात खासदारांमार्फत आवाज उठवावा, महामहीम राष्ट्रपतींकडे लोकभावना मांडाव्यात आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश रद्द करण्यासाठी प्रयत्न करावेत. यामुळे माधुरी हत्तीणीला पुन्हा नांदणी मठात आणणे शक्य होईल.
या निवेदनावेळी शिवसेना नेते व खासदार विनायक राऊत, आमदार व शिवसेना नेते सुनील प्रभू, जिल्हासंपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.