अहिल्यानगर, 25 जून, (हिं.स.) :- पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या श्री संत जनार्दन स्वामी महाराज (पालखी) पायीदिंडीचे भिंगारमध्ये आगमन होताच भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भक्तीमय वातावरणात जय हरी विठ्ठल.. श्री हरी विठ्ठलच्या गजरात स्वागत करण्यात आले. शहरा सह उपनगरात दिंडीचे आगमन झाले असताना वारकरींमुळे वातावरण प्रफुल्लित व भक्तीमय बनले आहे.
भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, सर्वेश सपकाळ, प्रांजली सपकाळ, रमेश वराडे, अभिजीत सपकाळ, संपतराव बेरड यांनी रथातील पादुका डोक्यावर घेऊन परिसरातून मिरवल्या.दिंडीतील वारकऱ्यांनी पुंडलीक वरदा हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकारामचा जयघोष केला.
पालखीतील पादुकांचे पूजन प्रा. माणिक विधाते, अमित खामकर, ईवान सपकाळ, अर्जुनराव बेरड, संपतराव बेरड, विलास तोडमल, सिंधुताई सपकाळ, संगीता सपकाळ, दिपाली सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. दिंडीचे प्रमुख ह.भ.प. आनंदे महाराज मुरारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
आनंदेवाडा श्रीक्षेत्र देवगिरी-दौलताबाद (जि. औरंगाबाद) येथून श्री संत जनार्दन स्वामी महाराज (पालखी) पायी दिंडी आषाढी वारीसाठी निघाली आहे. दिंडीचे भिंगारमध्ये मोठ्या भक्ती भावाने स्वागत करण्यात आले. नगर-करमाळा मार्गे ही दिंडी पंढरपूरला प्रस्थान करणार आहे.प्रा. माणिक विधाते यांनी दरवर्षी राष्ट्रवादी व भिंगारकरांच्या वतीने सपकाळ परिवार दिंडीचे स्वागत करुन सेवा देत आहे. वारकऱ्यांची दरवर्षी केली जाणारी ही सेवा प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. संजय सपकाळ यांनी या दिंडीचे भिंगार शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने स्वागत करण्यात येत असल्याची माहिती दिली. यावेळी दिंडीतील वारकऱ्यां ना सपकाळ परिवाराच्या वतीने अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.