सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’ प्रणालीत राज्य व देशात रोल मॉडेल ठरेल : ना. नितेश राणे
सिंधुदुर्ग, 1 मे (हिं.स.)।
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा हा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) युक्त जिल्हा म्हणून आता देशात ओळखला जाणार आहे. देशात हा जिल्हा ‘एआय’ प्रणालीमध्ये पहिला जिल्हा ठरणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरीकांना कमी कालावधीत दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असून सर्वांच्या साथीने यात आपण निश्चितच यशस्वी होऊ, असा विश्वास राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला. ए आय प्रणाली सिंधुदुर्ग जिल्ह्याने आत्मसात केली असून प्रशासनात त्याचा वापर करण्याचा शुभारंभ आज करण्यात आला. राज्यात आणि देशात एआय प्रणाली वापरणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला जिल्हा ठरला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने प्रशासनात एआय प्रणालीचा समावेश झाला आहे.
सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना ना. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा एआय युक्त जिल्हा करण्यामागील संकल्पना विषद केली.
ते म्हणाले, पुढची २५ ते ५० वर्षे सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातला नाही, तर देशातला पहिला एआय युक्त जिल्हा म्हणून आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख होणार आहे. आज प्रत्येकजण गुगल आणि इंटरनेट वापरतो. त्यात ‘एआय’चा वापर किती प्रभावीपणे होतो, याचा अभ्यास करावा. प्रत्येक देश आज ‘एआय’च्या माध्यमातून आपल्या देशाचा विकास करण्यामध्ये एकमेकांबरोबर स्पर्धा करतात. दुबईमध्ये ‘एआय’च्या माध्यमातून काम करणारं एक विशेष शहर विकसित झालं आहे. देशपातळीवर देखील देशातील महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी विकसित देश होण्यासाठी ‘एआय’चा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्रमाची वेळ देखील योग्य साधली गेली आहे.
ए आय चा हा प्रवास आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. या सगळ्याचे श्रेय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते. सरकार आले आणि तेव्हापासूनच आमचा महाराष्ट्र प्रगत झाला पाहिजे, ही दूरदृष्टी ठेवून त्यांनी प्रवास सुरू केला आणि त्यातून आम्हाला सगळ्यांना त्यांनी प्रेरणा द्यायला सुरुवात केली. ‘मार्वल’ ही जी संस्था आहे, जेव्हा आम्हाला मंत्री म्हणून आपले मंत्रालय ‘एआय’मध्ये आणायचे, अशा सूचना आल्या, माझ्या मत्स्यव्यवसाय विभाग आणि बंदरे विभागामध्ये ‘एआय’चा वापर कसा करू शकतो, याबद्दल ‘मार्वल’ बरोबर माझ्या बैठका सुरू झाल्या. त्या बैठकीमध्ये मी साई कृष्णन आणि प्रामुख्याने हरि पोद्दार यांना एक दिवस फोन केला, ‘आपल्या विभागांतर्गत ‘एआय’ करू, पण एक नवीन प्रयोग करून बघूया. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला ‘एआय’युक्त करायचे असेल, तर काय करायला लागेल?’ त्यांनी सांगितले, ‘हा विषय कधीच आमच्या समोर आलेला नाही. करू शकतो का, कसे करायचे, याचा आम्ही कधी विचार केला नाही, कारण जिल्हा पातळीवर आपल्याला तंत्रज्ञान आणायचे असेल, तर त्याच्यासमोर प्रचंड आव्हाने होती. त्यामुळेच या प्रणालीचे नियोजन करत असताना, नेमके आम्ही काय करतो, हे आपल्या लोकांना समजले पाहिजे, ‘एआय’ युक्त सिंधुदुर्ग जिल्हा झाला म्हणजे काय, ते आम्हालाही सांगता आले पाहिजे, आपल्यालाही समजले पाहिजे. ‘एआय’ युक्त सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये काय बदल घडणार आहे, हे आपल्याला समजले पाहिजे, तुम्हालाही चार नवीन गोष्टी कळल्या पाहिजेत, म्हणूनच थोड्या संवादात्मक पद्धतीने आम्ही या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे,” असे सांगितले.
आपला दुर्गम जिल्हा आहे, डोंगराळ जिल्हा आहे, नेटवर्क आपल्यासमोर महत्त्वाची समस्या आहे, तर मग त्यावर तुम्ही उपाय कसा करणार? तिथे तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करणार?’ त्यावर आम्ही सगळ्यांनी ठरवले, ‘प्रवासाला सुरुवात तरी करू. नकारात्मक विचार करून उपयोग नाही. आपल्याला जर करायचे असेल, तर इच्छाशक्ती आणि प्रवाहाच्या विरुद्ध प्रवास करायला सुरुवात केली, तर निश्चितपणे यश मिळू शकते.’ असे ते म्हणाले.
जिल्ह्याला विकसित जिल्हा करण्याच्या दृष्टिकोनातून आज आमच्यासमोर काय आव्हाने आहेत, याचा विचार केला. आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे, डॉक्टर कमी आहेत, कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. सिंधुदुर्गमध्ये ४५ ते ५५ टक्के कर्मचारी प्रत्येक विभागात भरलेले आहेत. १०० टक्के उत्पादकता मिळवण्यासाठी आपल्याला मार्ग शोधावा लागेल. कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे निर्माण झालेली दरी ‘एआय’च्या माध्यमातून भरता येऊ शकते. ‘एआय’ कोणाच्या नोकऱ्या घेणार नाही, आम्हाला माहिती पुरवणार, डेटा पुरवणार, डेटा सगळ्यांचा एकत्र करणार. सामान्य नागरिकांनी जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालयामध्ये कमी वेळ घालवावा, त्याला त्याचे काम पूर्ण करून तो आनंदाने परत आपल्या गावाकडे निघावा, या दृष्टिकोनातून ‘एआय’चा वापर होणार आहे.
‘एआय’चा वापर करत असताना, अधिकाऱ्यांची मक्तेदारी वाढणार नाही, याची काळजी घेतली जाईल. कोणीही गैरवापर करता कामा नये. ‘एआय’मुळे नोकऱ्या जाणार नाहीत, उलट इंटरनेट आणि सेलफोन आल्यामुळे जशा नोकऱ्या वाढल्या, तशाच ‘एआय’मुळेही वाढतील. सिंधुदुर्गमधील तरुणांनी ‘एआय’च्या क्षेत्रात येणाऱ्या संधींचा अभ्यास करावा.
सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’युक्त झाला म्हणजे काय, याचे सादरीकरण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळासमोर करणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्हा रोल मॉडेल म्हणून जगासमोर आणि राज्याच्या समोर उभा राहील, याचा मला अभिमान आहे,” असे ना. नितेश राणे यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात आरोग्य, कृषी, पोलीस, आरटीओ आणि वन अशा पाच विभागात एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करायला सुरुवात झाली आहे. नजीकच्या काळात महसुल, न्याय व्यवस्था आणि जिल्हा परिषद एआय युक्त करण्यात येणार आहे. जिल्हा एआय युक्त झाल्यामुळे प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता येईल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. या उपक्रमाचे प्रकल्प संचालक अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी याबाबतचे सादरीकरण केले.