सोलापूर, 22 मार्च (हिं.स.)।
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने एप्रिल ते जून दरम्यानचा संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये यंदाच्या वर्षी जिल्ह्यास ४८६ पाण्याचे टँकर लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक टँकर हे अक्कलकोट तालुक्यास लागणार आहे.
सोलापूर जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून परिचित आहे. गतवर्षी जिल्ह्यातील विविध तालुक्यांत कमी-जास्त पाऊस पडला आहे. जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक कमी पाऊस पडल्याने यंदाच्या वर्षी तालुक्यात तीव्र पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तालुक्यास ११७ पाण्याच्या टँकरचे नियोजन केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात ३८६ गावात जलजीवन मिशन अंतर्गत कामे पूर्ण झाली असून, गावातील प्रत्येक घरात पाण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे बरच गावांची पाणी टंचाई कमी झाली आहे. ज्या गावामध्ये जलजीवनचे काम पूर्ण झाले आहे, अशा गावात पाणी टंचाई भासण्याची शक्यता कमी असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सांगितले.