सोलापूर, 23 एप्रिल (हिं.स.) : आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 6 जुलै 2025 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संताच्या पालखी सोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. वारी कालावधीत येणा-या वारकरी भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज पंढरपूर येथील विविध ठिकाणची पाहणी केली व अनुषंगिक मार्गदर्शक सूचना दिल्या.
यावेळी पालकमंत्री गोरे यांनी वाखरी पालखीतळ, वाळवंट, चंद्रभागा नदीपात्र, घाट तसेच पत्रा शेड येथे होणाऱ्या नियोजित दर्शन मंडप व स्काय वॉक बाबतची माहिती घेऊन संबंधित ठिकाणची पाहणी केली. त्याचबरोबर भक्ती सागर (65 एकर) येथे होणाऱ्या नियोजित संत नामदेव स्मारक जागेची पाहणी करून, भक्ती सागर येथे मोठ्या प्रमाणात सावली देणारी, पानगळ कमी असणारी तसेच कमी पाण्यात वाढणाऱ्या झाडांची लागवड करावी यासाठी नियोजन समितीतून निधीची उपलब्धता केली जाईल असे सांगितले.
प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वाखरी तळावर भाविकांसाठी घेण्यात येत असलेल्या सोयी सुविधा तसेच पत्रा शेड येथे नियोजित दर्शन मंडप व स्काय वॉक ची माहिती दिली. त्याप्रमाणेच 65 एकर वर भाविकांसाठी देण्यात येत असलेल्या व नदीपात्रात प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या सुविधांची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी त्यांच्या समवेत आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद , मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, कार्यकारी अभियंता अमित निंबकर, गटविकास अधिकारी सुशील संसारे, सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, महामार्ग प्राधिकरणाचे केशव घोडके तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.