सोलापूर, 12 मे (हिं.स.)।
सांगोला तालुक्यातील शिरभावीसह ८१ गावांची प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली.
आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शिरभावीसह ८१ गावांची प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत ही योजना चालू न झाल्यास ८२ गावे व वाड्या- वस्त्यांवर पाणीटंचाई उद्भवणार असून, सध्या सांगोला तालुक्यात पाणीटंचाई जाणवण्याची चिन्हे आहेत. ही योजना तातडीने कार्यान्वित करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांना पटवून दिली.
या प्रश्नाची गंभीरता लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांना टंचाई निधीमधून ५.४१ कोटी इतकी थकबाकी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. या आदेशाची दखल घेत लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
हा निधी तातडीने उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.