सोलापूर, 2 ऑगस्ट – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे गटाला सोलापुरात मोठा धक्का बसला आहे. नाराज झालेल्या तब्बल ११ पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षाकडे पाठवले आहेत. यात प्रामुख्याने माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आणि हरिभाऊ चौगुले यांनी पुढाकार घेतल्याचे समजते.
दोन दिवसांपूर्वीच सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी नाराज होऊन राजीनामा दिला होता. त्यांनी, “आपणाला विश्वासात न घेता जिल्ह्यात परस्पर पदाधिकाऱ्यांच्या निवडी आणि प्रवेश होत आहेत,” अशी नाराजी व्यक्त केली होती.
याच पार्श्वभूमीवर सावंत गटाचे मानले जाणारे दिलीप कोल्हे आणि हरिभाऊ चौगुले यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपले राजीनामे जाहीर केले. लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या कार्यपद्धतीवर सर्वांनी नाराजी व्यक्त केली.
पदाधिकाऱ्यांच्या मते, महेश साठे कोणालाही विश्वासात घेत नाहीत आणि त्यांच्या निर्णयांमुळे पक्षाची वाताहात होत आहे. “त्यांना पदे वाटण्याचा कोणताही अधिकार नसताना ते लुडबुड का करत आहेत? मी सोलापूरचा समन्वयक असूनही मला काहीही विचारले जात नाही,” अशी नाराजी कोल्हे यांनी व्यक्त केली.