सोलापूर, 15 जून (हिं.स.)।
माढा तालुक्यातील मोडनिंब येथील भाजी विक्रेत्याचा प्राथमिक अंदाजानुसार चक्कर येऊन, चालत्या तीन चाकी वाहनातून पलटी होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळच्या सुमारास सोलापूर – पुणे महामार्गवरील वेनेगाव हद्दीतील हॉटेल साईसागर समोर घडली. सिकंदर रसूल तांबोळी वय ५२ रा. मोडनिंब ता. माढा असे मयत झालेल्या भाजी विक्रेत्याचे नाव आहे. सिकंदर उर्फ प्यारे तांबोळी हे नेहमी प्रमाणे टेंभुर्णी येथील भाजी मंडईतील लिलावातून भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोडनिंब येथून सकाळी ६ वाजता निघाले होते.
टेंभुर्णी जवळील वेनेगाव येथे आले असता. अचानक चक्कर येऊन तीन चाकी माल वाहतूक करणारे वाहन पलटी होऊन ते दरवाजातून बाहेर रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये त्यांचा डोकीस जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सिकंदर तांबोळी यांनी महामार्गवरील अरण येथील पेट्रोल पंपात डिझेल भरताना झोप लागली असल्याची माहिती काहींनी दिली. यामुळे हा अपघात चक्कर येऊन झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसानी व्यक्त केला असून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत.