सोलापूर, 4 मे (हिं.स.)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प सोलापुरातील रे-नगरात होत आहे. पहिल्या टप्प्यात १५ हजार २४ कामगारांची घरे बांधून पूर्ण असून आता दुसऱ्या टप्प्यातील आठ हजार घरकुलांचे काम सुरू आहे. या वर्ष अखेरपर्यंत दुसरा टप्पाही पूर्ण होईल, अशी माहिती ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांनी दिली.
सध्या दुसऱ्या टप्प्यातील १४ हजार ९७६ पैकी आठ हजार घरांचे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरित घरांमधील दोन हजार घरांना नुकतीच बांधकाम परवानगी मिळाली आहे. त्यामुळे त्याचेही काम सुरू करण्यात येणार असून राहिलेल्या घरांना बांधकाम परवाना मिळावा, त्याचे ले-आऊट मंजूर व्हावे, यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव देण्यात आला आहे.
डिसेंबर २०२५ पूर्वी दुसरा टप्पा पूर्ण होईल, असा विश्वास ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या टप्प्याच्या लोकार्पणासाठी देखील पंतप्रधान येतील, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. आता उर्वरित १५ हजार घरांचे बांधकाम पूर्ण करून लवकरच ताबा द्यावा, अशी मागणी नाव नोंदणी केलेल्या कामगारांतून होत आहे.