सोलापूर, 8 ऑगस्ट – ‘सोलफुल सोलापूर’ उपक्रमांतर्गत आयोजित पर्यटन विकास कार्यशाळेचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
कार्यशाळेत जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी शुक्राचार्य भोसले, पुणे विभागाचे पर्यटन समन्वयक अधिकारी सूर्यकांत भुजबळ, पर्यटन उपसंचालक कुंभार मॅडम, पर्यटन प्रकल्प अधिकारी मयूर नांगरे, सहाय्यक पर्यटन अधिकारी गुणवंत पवार, जिल्हा उपनिबंधक सहाय्यक आबासाहेब गावडे, कृषी पर्यटन केंद्र संचालक समिती अध्यक्ष लहू अवताडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वर्खडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आ. देशमुख यांनी चिंचणी गावाच्या पर्यटन विकासाचा यशस्वी अनुभव सांगत “आई योजना” अंतर्गत महिलांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची माहिती दिली. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याचे आवाहन केले. कुडल येथील 800 वर्षांपूर्वीच्या शिलालेखासारख्या ऐतिहासिक ठिकाणांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच पर्यटन सप्ताहात व्यापाऱ्यांनी सवलतीच्या दरात सेवा देण्याचे आवाहनही केले.
जिल्हा कृषी अधीक्षक भोसले यांनी कृषी पर्यटन योजनेअंतर्गत शेततळे, फळबाग, नर्सरीसाठी सहाय्य उपलब्ध असल्याचे सांगितले. शाश्वत शेती आणि जमिनीची सुपीकता राखण्यावर भर दिला. पुणे विभागाचे पर्यटन अधिकारी अभिजीत उघडे यांनी स्थानिक कुटुंबासोबत राहण्याची संकल्पना, वेकेशन होम, पर्यटक व्हिला, पर्यटक अपार्टमेंट यांसारख्या निवास पर्यायांची माहिती दिली. महा बुकिंग प्रणालीवर नोंदणी करून प्रमाणपत्र मिळवता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्योजकांनी जल पर्यटनातील बोटींची मागणी, नर्सरी नोंदणी प्रक्रिया, तसेच शेती परिसरातील निवासस्थाने उभारण्यासाठी कर्ज योजनांबाबत प्रश्न विचारले. काही निवासस्थाने हायवेपासून अर्धा किलोमीटर अंतरावर असून तेथे विदेशी पर्यटक भेट देतात, असेही सांगण्यात आले.
या कार्यशाळेतून पर्यटन, कृषी आणि महिला उद्योजकता यांना चालना मिळेल आणि पर्यटन सप्ताहामुळे जिल्ह्याचा सांस्कृतिक व आर्थिक विकास वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यशाळेच्या प्रारंभी श्री. भुजबळ यांनी 27 सप्टेंबर 2025 रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्त 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान पर्यटन सप्ताह साजरा होणार असल्याची माहिती दिली. या कालावधीत प्रमुख पर्यटन स्थळांना भेटी आणि पर्यटन दिंडीचे आयोजन केले जाईल. कृषी पर्यटन केंद्रांमुळे ग्रामपंचायतींना आर्थिक लाभ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
