सोलापूर : जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या संचारबंदीच्या आदेशात काहीअंशी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये बससेवेसह अत्यावश्यक गृहीत धरून मार्केट, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 यावेळेत सुरू ठेवण्यास आजपासून शिथिलता देण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
अत्यावश्यक सेवेची दुकाने, आस्थापना चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाअंतर्गत बससेवा जास्तीत जास्त 50 टक्क्यांच्या मर्यादेत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व बिगर अत्यावश्यक सेवा देणारी मार्केट दुकाने ही सकाळी 9 ते सायंकाळी 7 यावेळेत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी सुरक्षा आणि शारीरिक अंतर ठेवण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मॉल्समधील उपहारगृहांना घरपोच सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. घराबाहेर शारीरिक व्यायाम करण्यास परवानगी असणार आहे. शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये ई-कामकाज, उत्तरपत्रिकांची तपासणी, मूल्यांकन, शास्त्रज्ञ, संशोधन तसेच शिक्षणाव्यतिरिक्त कामकाज सुरू राहणार आहे. राज्य शासनाने ज्या केशकर्तनालये, स्पा, सलून, ब्युटीपार्लर यांना परवानगी दिलेली आहे. मैदानी तसेच असांघिक खेळ अशा क्रीडा प्रकाराला 5 ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे. जलतरण प्रकाराला परवानगी नाकारण्यात आली आहे.
* बार्शी, वैरागमध्ये एक दिवसाची सूट
जिल्ह्यातील बार्शी आणि वैराग शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी 1 ऑगस्ट रोजी रात्री 1 वाजल्यापासून 2 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत केवळ 1 दिवसाची सूट दिली आहे. त्यानंतर 2 ऑगस्टच्या रात्री 1 वाजल्यापासून पुन्हा संचारबंदीचे आदेश कायम केले आहेत. त्या एक दिवसात फळे, भाजी, किराणा खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवाही सुरळीत राहणार आहेत.