रत्नागिरी, 28 जून, (हिं. स.) : ज्ञानेश्वर महाराजांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. सम्राट अशोकाने सम्राटपदाची जबाबदारी पेलली. छत्रपती संभाजी महाराजांनी इतिहास घडवला. अशा थोर व्यक्तींचे आयुष्य विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरावे. त्यासाठी शिक्षकांनी शिल्पकार बनून विद्यार्थ्यांची संस्काररूपी मूर्ती घडविली पाहिजे, असे विचार पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये झालेल्या “विद्यार्थी दशा आणि दिशा” या विशेष कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते.
ते म्हणाले, हा कार्यक्रम म्हणजे केवळ माहितीचा नव्हे तर संस्कारांचाही संगम आहे. शाळेतील शिक्षक हे केवळ शिक्षक नसून, संस्कारवर्गाचे शिल्पकार आहेत. त्यांच्याकडून शिक्षणाबरोबरच संस्कार मिळणे ही खूप मोठी संपत्ती आहे. हीच योग्य वेळ आहे. प्रत्येकाने अमली पदार्थांपासून दूर राहणे आणि इतरांनाही दूर ठेवून आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे स्वास्थ्य टिकवावे. अमली पदार्थांमुळे केवळ मुलेच नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाज बिघडतो. शिक्षकांनी स्वत:हून अशा कामात पुढाकार घेऊन नवी पिढी घडवावी. स्वस्थ समाज घडवावा. अशा कार्यक्रमांची जनजागृती करावी. कार्यक्रमास शिक्षक आणि दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.