लंडन , 13 जून (हिं.स.)। अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावरील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय खेळाडू आज(दि.१३) दंडावर काळी फित बांधून मैदानावर उतरले.
भारतीय संघ इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी लंडनमध्ये पोहचला असून, संघाने सरावही सुरू केला आहे. बेकेनहॅमच्या मैदानात आज(दि. १३)भारत ‘अ’ संघाविरुद्ध सराव सामन्यासाठी मैदानात उतरला आहे. या चार दिवसीय सराव सामन्यासाठी टीम इंडियातील खेळाडू काळ्या फिती बांधून मैदानात उतरले.अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघातील खेळाडूंनी सामन्याला सुरुवात होण्याआधी एक मिनिटांचे मौन बाळगत खेळाडूंनी अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील मृत्यांना श्रद्धांजलीही वाहिली.
दरम्यान, काल (दि.१२) दुपारी अहमदाबादहून लंडनच्या दिशेनं झेपावलेले एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची दुर्घटना घडली होती. एअर इंडिया कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, विमानात २३० प्रवासी होते. त्यातील ६९ भारतीय आणि ५३ ब्रिटिश नागरिकांसह ७ पोर्तुगीज आणि एका कॅनेडियन प्रवाशांचा समावेश होता. याशिवाय १२ क्रू मेंबर्स या विमानात होते. भीषण विमान अपघातात फक्त एकमेव प्रवाशी बचावला आहे.