अमरावती, 19 मे (हिं.स.)।राज्यातील शाळांमध्ये अलीकडेच वेगवेगळ्या घडलेल्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे याची दखल शालेय शिक्षण विभागाने घेतली आहे . त्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये आता नव्या नियुक्त शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियुक्ती देताना त्यांचा चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करावा लागणार आहे. एवढेच नव्हे तर नव्या शिक्षकाचा फोटो व त्याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात जमा केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध माध्यमांच्या शाळांमध्ये अघटित घटना घडल्या आहेत .त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा संकटात आली आहे .यावर तोडगा म्हणून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्या उपायोजना संदर्भात निर्देश जारी केले आहे.
प्रत्येक शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना त्याची पार्श्वभूमी, पूर्वीची सेवा, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी याची पडताळणी करण्यात येणार आहे. त्या कर्मचाऱ्याला नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल पोलीस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेणे अनिवार्य झाले आहे. एवढेच नव्हे तर सदर कर्मचाऱ्याच्या नेमणुकीनंतर संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह त्याची सर्व तपशीलवार माहिती स्थानिक पोलीस यंत्रणे कडे द्यावी लागणार आहे .कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणीकरिता क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम सारख्या तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजनांचा वापर करण्याचा यावा असे निर्देशही देण्यात आले आहे. नेमणुकीनंतर एखाद्या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी ही फौजदारी गुन्ह्याशी संबंधित असल्याचे निदर्शनास आल्या त्या तात्काळ सेवेतून कमी करण्यात यावे असेही निर्देश देण्यात आले आहे.
शाळेतील वाहतूक सुरक्षा गृह व्यवस्थापन तसेच उपाहारगृह यासाठी नेमण्यात येणारा कर्मचारी वर्ग मान्यता प्राप्त संस्थेकडून नेमण्यात येणार आहे. सदर कर्मचाऱ्यांची पोलीस यंत्रणे कडून चारित्र्य पडताळणी करून प्रमाणपत्र घेण्यात यावे असे स्पष्ट निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत .विशेष म्हणजे हा नियम नियमित, बाह्य स्त्रोतांद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात येणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना लागू राहणार आहे. मुलांवरील हिंसाचार किंवा गैरवर्तनाचा समावेश असलेल्या कोणत्याही घटनेबाबत वेळेवर दखल घेण्यासाठी मुलांशी संबंधित शासकीय आणि बिगर शासकीय संस्थांच्या प्रमुखांवर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे .या प्रमुखांनी पर्यवेक्षक म्हणून काम करावे असे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या शाळांमध्ये बायस्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी पोलीस यंत्रणेमार्फत करून घेतलेली नसल्यास अशी पडताळणी तात्काळ करून घेण्यात यावी याची सर्वस्वी जबाबदारी शाळा व्यवस्थापनावर टाकण्यात आली आहे.
प्राथमिक साठी महिला कर्मचारीच!शाळांमध्ये बायस्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करताना पूर्व प्राथमिक तसेच इयत्ता पहिली ते सहावी या वर्गासाठी शक्यतो महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहे.