नवी दिल्ली, 31 मे (हिं.स.) : भारतात कोरोना साथरोगाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. देशात कोरोना रुग्णांची 2710 झाली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीवरुन कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये असल्याचे आढळून आले आहे.
देशात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग केरळमध्ये झाला आहे. काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 25 मे रोजी कोरोना रुग्णसंख्येत 5 पटीने वाढ झाली. रुग्णसंख्येने 1000 चा टप्पा ओलांडला होता. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये 1147 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 424 , दिल्लीमध्ये 294 आणि गुजरात येथे 223 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 148 प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर पश्चिम बंगालमध्ये 116 रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत 7 कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 2 तर दिल्ली, गुजरात, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
या वर्षी दिल्लीत कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत राजधानीत 56 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीत कोरोनाचे एकूण 294 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हा सौम्य आहे. परंतु त्याचा परिणाम गंभीर रुग्ण आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या रुग्णावर होत आहे. दरम्यान, गाझियाबाद जिल्ह्यात 5 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 19 झाली आहे.