जळगाव, 8 मे (हिं.स.) मागील आठवड्यात काश्मीर पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने ७ मे रोजी पाकीस्तानात सिंदुर ऑपरेशन यशस्वी केले आहे. यामध्ये नऊ ठिकाणी हवाई मारा करत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला असून भारत आणि पाकिस्तान मध्ये कोणत्याही वेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते यामुळे जे जवान घरी सुट्टीसाठी आले होते. अशा सर्व जवानांना सीमेवर बोलवण्याचे आदेश प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
यामध्ये पाचोरा तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) गावातील असलेल्या मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचा नुकताच ५ मे रोजी विवाह संपन्न झाला होता. परंतु विवाह झाल्यावर तात्काळ त्यांना सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश आले आहेत. मनोज याने आपल्या अर्धांगिनीला परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला असून देशसेवेचे धाडस दाखवून पुन्हा आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाला आहे.
या धाडसी निर्णयाचे परिसरात मनोज पाटील यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सदर सैनिक आमच्या गावाची शान असून आमचा सैनिक एक नव्हे तर दहा पाकिस्तानीचा खात्मा करूनच विजय मिळवतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे.