नाशिक, 7 मे (हिं.स.)।
भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या निर्णायक कारवाईवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, हे युद्ध कोणत्याही धर्माविरोधात नाही, तर दहशतवादाविरोधात पुकारले गेले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कराचे अभिनंदन करत देशातील जनतेला एकतेचा संदेश दिला.
भुजबळ म्हणाले, पाकिस्तानातील अतिरेकी तळांवर करण्यात आलेल्या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर नाव देण्यात आले आहे. या कारवाईमुळे प्रत्येक भारतीयाचा मान अभिमानाने उंचावला आहे. आपल्या महिलांचे कुंकू पुसणार्यांना आज उत्तर देण्यात आले आहे. हे अजून संपलेलं नाही, त्यामुळे देशवासीयांनी सज्ज राहणं आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की, लष्कराने स्पष्ट केलं आहे की, कारवाईत एकाही सामान्य नागरिकाला इजा झाली नाही. फक्त अतिरेकी आणि त्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. अमेरिका देखील पाकिस्तानला उत्तर देऊ नका असा इशारा देत भारताच्या भूमिकेचा पाठिंबा दर्शवतो आहे.