चीनच्या शंघाई येथील बैठकीत पाकिस्तानला ठणकावले बीजींग , 26 जून (हिं.स.)। क्षुल्लक स्वार्थासाठी जे दहशतवादाचे समर्थन करतात, त्यांचे पालनपोषण करतात आणि त्यांचा वापर करतात त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. चीनच्या किंगदाओ येथे आज, गुरूवारी आयोजित शांघाई सहकार्य संघटनेच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी राजनाथ सिंह म्हणाले की, जे लोक दहशतवादाला खतपाणी घालत आहेत. तसेच आपल्या संकुचित आणि स्वार्थी हेतूंसाठी दहशतवादाचा वापर करत आहेत, त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. काही देश सीमेपलीकडून दहशतवादाला एक धोरण म्हणून वापरत आहेत. तसेच दहशतवाद्यांना आश्रय देत आहेत.
अशा दुटप्पी भूमिकेला कुठलंही स्थान असता कामा नये. तसेच एससीओने अशा देशांचा निषेध करण्यासाठी कुठलीही शंका बाळगता कामा नये. पहलगाम हल्ल्याचा थेट उल्लेख करताना राजनाथ यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी, ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या दहशतवादी गटाने निष्पाप पर्यटकांवर एक भयानक आणि घृणास्पद हल्ला केला, पीडितांना धार्मिक ओळखीच्या आधारे चिन्हीत केल्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. पहलगाम हल्ल्यात वापरलेले डावपेच हे लष्कर-ए-तोयबाने केलेल्या पूर्वीच्या हल्ल्यांशी जुळतात, यावरून वारंवार आणि ओळखता येणारा धोका अधोरेखित होतो, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
पुढे बोलताना राजनाथ सिंह यांनी दहशतवादाविरोधातील भारताची भूमिकाही स्पष्ट केली. ते म्हणाले की, दहशतवादाविरोधात भारताचं धोरंण त्याच्या भूमिकेतून स्पष्ट होत आहे. यामध्ये दहशतवादाविरोधात स्वत:चं संरक्षण करण्याच्या आमच्या अधिकाराचाही समावेश आहे. दहशतवादाची केंद्रं कुठे आहेत हे आम्ही दाखवून दिले आहे. दहशतवादाची ही केंद्र आता सुरक्षित नाही आहेत. तसेच आम्ही त्यांना लक्ष्य करण्यास मागे पुढे पाहणार नाही, हे आम्ही दाखवून दिले आहे, असेही राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितले. तसेच आपल्या प्रदेशामध्ये सर्वात मोठी आव्हानं ही शांतता, संरक्षण आणि परस्पर अविश्वासाशी संबंधित आहेत.
तसेच या समस्यांचं कारण वाढता कट्टरतावाद, अतिरेकी आणि दहशतवादी आहेत. शांतता आणि समृद्धी ही दहशतवाद आणि दहशतवादी समुहाच्या हातात विध्वंसक हत्यारं असताना राहू शकत नाही. या आव्हानांचा सामना करण्यासाठी निर्णायक कारवाईची आवश्यकता आहे. तसेच या आव्हानांविरोधात लढण्यासाठी आणि आपल्या सामुहिक सुरक्षेसाठी आपण एकजूट झालं पाहिजे, असे आवाहन यावेळी राजनाथ सिंह यांनी केले. ———–