सोलापूर, 13 मे, (हिं.स.)।
गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घ्या, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीसाठी करमाळा तालुक्यात आतापासूनच बेरजेचे राजकारण सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
करमाळा तालुक्यात आमदार नारायण पाटील यांची पंचायत समितीवर निर्विवाद सत्ता होती. नारायण पाटील यांच्याकडे दहापैकी सात तर माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्याकडे सदस्य व बागल गटाकडे दोन सदस्य होते. करमाळा नगरपालिकेवर गेल्या चार टर्मपासून जयवंतराव जगताप यांच्याकडे सत्ता असून गतपंचवार्षिक निवडणुकीत जगताप गटाने बागल गटाशी युती करून निवडणुका जिंकल्या होत्या.
नगराध्यक्षांच्या थेट निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव वैभवराजे जगताप नगराध्यक्ष म्हणून विजयी झालेले होते. परंतु, निवडणुका झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच जगताप व बागल यांची युती तुटली व विरोधात निवडणूक लढवलेल्या सावंत गटाने जगताप गटाबरोबर दोस्ताना करून संपूर्ण पाच वर्षे सत्तेत सहभाग नोंदवला. तर, सत्तास्थानी असलेल्या बागल गटाला विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी लागली. नागरिक संघटना विरोधात होती.