चेन्नई, 29 मे (हिं.स.)।तमिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजेश यांचे आज (२९ मे) सकाळी ७५ व्या वर्षी निधन झाले. त्यांना श्वसनाच्या त्रासामुळे चेन्नईतील रामा चंद्रा रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचे निधन झाले.राजेश यांनी ५० वर्षांच्या कारकीर्दीत सुमारे १५० हून अधिक तमिळ आणि मल्याळम सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या. सुपरस्टार रजनीकांत यांनी राजेश यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली आहे.
राजेश यांनी १९७४ मध्ये ‘अवल ओरु थोडर कथै’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांच्या अभिनयातील विविधतेमुळे ते प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून गेले.राजेश यांच्या निधनाने तमिळ चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. सुपरस्टार रजनीकांत यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत लिहिले, “माझ्या जवळच्या मित्राचे अचानक निधन झाल्याने मी अत्यंत दुःखी आहे. तो एक उत्तम माणूस होता. त्याच्या आत्म्यास शांती लाभो.”
“अभिनेत्री राधिका सरथकुमार यांनीही शोक व्यक्त करत लिहिले, “राजेश यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. आम्ही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. चित्रपटसृष्टी आणि आयुष्याविषयी त्यांचे ज्ञान खूपच व्यापक होते. त्यांची आठवण सदैव राहील.”
राजेश यांच्या पार्थिवावर चेन्नईतील रामापुरम येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा दीपक आणि मुलगी दिव्या असा परिवार आहे. त्यांची पत्नी जोन सिल्व्हियाचे २०१२ मध्ये निधन झाले होते. राजेश यांच्या निधनाने तमिळ चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे चाहते आणि सिनेसृष्टीतील कलाकार भावुक पोस्ट करत राजेश यांना श्रद्धांजली वाहत आहेत.