मुंबई, 2 सप्टेंबर – दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांच्या संवैधानिक शपथेची आठवण करून दिली आहे. त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांचे पहिले कर्तव्य म्हणजे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करणे होय. अग्निहोत्रींच्या मते, एखाद्या चित्रपटाला केंद्रीय फिल्म प्रमाणन मंडळाकडून (सीबीएफसी) मंजुरी मिळाल्यानंतर त्याला अडवणे हे थेट संविधानाच्या विरोधात आहे.
अग्निहोत्रींचा नवा चित्रपट ‘द बंगाल फाइल्स’ हा 16 ऑगस्ट 1946 च्या डायरेक्ट अॅक्शन डे आणि नोआखाली हत्याकांडावर आधारित असून, तो 5 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्याआधीच या चित्रपटाला विरोध सुरू झाला आहे आणि बंदीची मागणी केली जात आहे. त्यामुळे दिग्दर्शकांनी ममता बॅनर्जी यांना विशेष विनंती करत एक व्हिडिओ मेसेज शेअर केला आहे.
त्यांनी आरोप केला की, पश्चिम बंगालमधील अनेक प्रदर्शक राजकीय दबावामुळे चित्रपट दाखवण्यास घाबरत आहेत. काही जण स्क्रीनिंग थांबवण्याचा प्रयत्न करत असून चित्रपटावर बंदी आणण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. अग्निहोत्री यांनी सांगितले की, त्यांच्या विरोधात खोट्या एफआयआर दाखल करण्यात आल्या असून त्यांना सतत कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
अग्निहोत्री म्हणाले की, भारताच्या इतिहासात बंगालचा अध्याय वेदनादायक राहिला आहे. डायरेक्ट अॅक्शन डे आणि नोआखाली नरसंहारासारख्या घटनांना विसरवण्याचा प्रयत्न झाला, पण ‘द बंगाल फाइल्स’ या घटनांवर प्रकाश टाकतो. हा चित्रपट कुठल्याही धर्म किंवा समुदायाविरोधात नसून मानवतेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या शक्तींना उघड करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
याआधी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटामुळेही मोठा वाद निर्माण झाला होता. त्याचप्रमाणे ‘द बंगाल फाइल्स’ संदर्भातही समर्थन आणि विरोध अशा दोन्ही प्रतिक्रिया उमटत आहेत.