नवी दिल्ली, 24 जून (हिं.स.) : राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात अवघ्या 5 महिन्यात 8 टक्के मतदार वाढल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलाय. यासंदर्भात ट्विट करत राहुल यांनी आणखी काही आरोप लावले आहेत.
राहुल गांधी यांनी अमेरिकेहुन परतल्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत वृत्तपत्रात लेख लिहून निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले होते. तर मुख्यमंत्री देवेंद फडणवीस वस्तुस्थिती मांडत राहुल यांच्या आरोपांना उत्तर दिले होते. तर आता राहुल गांधी यांनी थेट फडणवीस यांच्या मतदारसंघात वाढलेल्या मतदानाचा मुद्दा एक्सवर उपस्थित करून मोठा आरोप केला आहे. आपल्या पोस्टमध्ये राहुल म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात केवळ 5 महिन्यांत मतदार यादीत 8 टक्के मतांची वाढ झाली आहे. काही मतदान केंद्रांवर 20 ते 50 टक्के पर्यंत मतांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांनीही अनोळखी लोकांनी मतदान केल्याचे सांगितल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
हजारो मतदारांचे पत्ते हे अयोग्य पद्धतीचे असल्याचे माध्यमांनीही स्पष्ट केले आहे. यावर निवडणूक आयोग शांत का आहे ? असा सवाल करून या सगळ्यांमध्ये निवडणूक आयोग सहभागी आहे का ?, हे अपघाती नाही, हे थेट मतांची चोरी आहे. त्यामुळे मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज तातडीने प्रसिद्ध करा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.