वर्धा, 5 जून (हिं.स.)।
पिपरी येथील प्रतिक झोडे या शेतकऱ्याने पारंपारिक शेतीला बगल देऊन एक एकर शेतीवर तुती लागवड केली. रेशीम उद्योगातुन पहिल्या वर्षी पहिल्याच महिन्यात 64 किलो कोषाचे उत्पादन घेऊन 30 हजार रुपयाचे व दुसऱ्या महिन्यात 103 किलो कोष उत्पादन घेऊन 54 हजार असे दोन महिन्यात एकून 84 हजार रुपयाचे उत्पन्न मिळविले.
वर्धा तालुक्यातील पिपरी येथील रहिवासी असलेल्या प्रतिक नामदेवराव झोडे या कृषि पदवीधारक पारंपारिक शेती करणाऱ्या शेतकऱ्याची येळाकेळी येथे दीड एकर शेती आहे. आजपर्यंत ते आई वडील यांच्या सहकार्याने पारंपारीक शेती म्हणजे पराटी, सोयाबीन थोडाफार भाजीपाला ही पीके घेत होते. निसर्गाचा लहरीपणा व बाजारपेठेतील उत्पादीत मालाचे भाव व उत्पादनास येणारा खर्च याचा ताळमेळ बसत नव्हता. कोणती शेती करावी ? या विचारात असतानाच झाडगाव येथील शेतकरी विशाल भागडे हे मागील 20 वर्षापासून सातत्याने रेशीम शेती करीत आहेत व भरघोस उत्पन्न कमवीत आहे, असे समजले.
त्यानुसार कुटुंबासोबत त्यांनी विशाल भागडे यांचे किटकसंगोपन चालू असतांना सातत्याने भेट देऊन रेशीम उद्योग समजुन घेतला. रेशीम शेती उद्योग व त्यातून हमखास मिळणाऱ्या उत्पन्न, बाजारपेठ याबाबत त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर रेशीम कार्यालयास भेट देवून वरिष्ठ तांत्रिक सहायक समुह प्रमुख रजनी बन्सोड यांच्याकडून रेशीम उद्योग व तुती बेणे उपलब्धतेबाबत अधिकची माहिती जाणून घेतली.
प्रतिक झोडे यांनी ऑगष्टमध्ये 1 एकर क्षेत्रावर तुती लागवड केली. जुगाड पध्दतीचे कच्चे शेड बांधकाम केले. त्यानंतर मार्च मध्ये 100 अंडीपुंजाची बॅच रेशीम विकास अधिकारी विलास शिंदे व रजनी बन्सोड यांचे सहकार्य व मार्गदर्शनाखाली घेतली. त्यात 64 किलो कोष उत्पादन होऊन 30 हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. त्यानंतर लगेचच 120 अंडीपुंजाची बॅच घेतली व त्यापासुन 103 किलो कोष उत्पादन होऊन 54 हजार रुपयांचे उत्पादन मिळविले.
आता आत्मविश्वास वाढल्याने प्रतिक झोडे यांनी पुढील बॅचसाठी 150 अंडीपुंजाची चॉकी बुक केली आहे व त्यानुसार व्यवस्थापन सुरु आहे. पुढील बॅचचे उत्पन्न 90 हजार ते 1 लाखापर्यंत होईल, असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. झोडे कुटुंबीय परिस्थीतीवर मात करुन अनुदानाची वाट न पाहता आपला आर्थिकस्तर उंचावत आहे, ही बाब कौतुकास्पद व ईतर शेतकऱ्यांनी प्रेरणा घेण्यासारखी आहे, असे मत रेशीम विकास अधिकारी विलास शिंदे यांनी व्यक्त केले.
प्रतिक यांच्या कुटुंबामधील आई, वडील व ते स्वतः शेतात काम करतात. 200 अंडीपुंजा पर्यंतची बॅच कुटुंबाचे सहकार्याने घेऊ, असे ते विश्वासाने सांगतात. काळजीपूर्वक कामे केली तर रेशीम उद्योग हा शाश्वत उद्योग असुन नोकरीच्या मागे न लागता हाच उद्योग मी करणार असे मत त्यांनी व्यक्त केले. तरुण शेतकऱ्यांनी फक्त अनुदान मिळते म्हणून रेशीम उद्योगाकडे पाहू नये तर या उद्योगातुन अल्प कालावधी मध्येच शेतकरी लक्षाधीश होऊ शकतो, असे ते सांगतात.