सोलापूर, 22 जून, (हिं.स.)। आषाढी यात्रा काळात पंढरपूरला येणाऱ्या 18 ते 20 लाख भाविकांना पूराचा त्रास होऊ नये यासाठी आज उजनी धरणातून सायंकाळी 5 वाजता 10,000 क्युसेक विसर्गानं भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली.
पुणे परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यानं पंढरपूरवर पुराची टांगती तलवार ऐन यात्रा कालावधीत राहणार होती. यावर तोडगा म्हणून आता उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आला आहे.उजनीच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच धरण जून मध्येच वेगाने भरू लागलं आहे. यामुळं शासन व प्रशासन यांची चिंता वाढली होती. सध्या उजनी धरणात जवळपास 64 टक्के एवढं भरलेलं असताना अद्यापही जोरदार पाऊस सुरू असल्यानं यात्रेपूर्वीच पंढरपूरला पुराचा धोका निर्माण झाला होता. यामुळं आता उजनी धरणाची पातळी मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न धरण प्रशासनाकडून केला जात आहे.
—————