खास प्रतिनिधी :
सोलापूर : ‘या’ ना ‘त्या’ कारणावरुन महिनोमहिने रखडलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका बिगुल वाजला तसं समितीमधील सत्तेच्या तराजूचं पारडं आपल्याकडेच ओढुन घेण्यासाठी जणू रस्सीखेच सुरु आहे. कल्याणशेट्टी, माने आणि हसापुरे तर दुसर्या बाजूला सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सिद्धाराम म्हेत्रे, बाळासाहेब शेळके यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान उद्या रविवार (ता.27) 5 हजार 421 सभासदांकडून बाजार समितीचे कारभारी कोण? याचा कौल मिळणार आहे.हे मतदार बाजार समितीत ‘अब किसकी बारी’ याचा फैसला करणार आहेत.
विशेष म्हणजे वेगवेगळ्या कारणावरुन अत्यंत अनपेक्षित अशी लढली जात असलेली बाजार समितीची निवडणूक निर्णायक वळणावर आहे. कोण उधळणार विजयाचा गुलाल आणि कोणाचा होणार टांगा पलटी घोडे पसार याबद्दलचे औत्सुक्य प्रचंड आहे. कट्टर समर्थकांना आपले गॉडफादर यांचाच पैनल निवडणुकीत बसण्याची खास खात्री वाटते.
दरम्यान, मागच्या कित्येक महिन्यांपासून बाजार समितीमध्ये आपलीच सत्ता येण्यासाठी मतांच्या गोळाबेरजेचे खूप काही शिजवलं आहे, त्याचे प्रतिबिंब मतपेट्यांमधून मतदार उमटवणार आहेत. शिवाय जे काही पॅनल प्रमुख आणि उमेदवारांनी पेरलं आहे, तेच उगवणार आहे. मात्र नेमकं कसं उगवलं? हे मंगळवार (ता.28) मतमोजणीतून कळणार आहे.
चिरंजीव मनिष यांच्यासाठी बापूंची प्रतिष्ठापणाला;
पहिल्याच घासाला खडा नको म्हणून खूप काही पेरलं
आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्याच पक्षाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना आव्हान देत, खास भाजपचे पॅनल उमेदवार उभे करीत या निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली. उत्तर तालुक्यापेक्षा त्यांनी दक्षिण सोलापूर या आपल्या विधानसभेच्या मतदार संघातून बाजार समितीच्या निवडणुकीत अधिकाधिक मतदान मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. सुपुत्र मनिष देशमुख यांना त्यांनी ग्रामपंचायत मतदार संघातून आखाड्यात उतवले आहे. सुपुत्राच्या बाजार समितीच्या पहिल्याच निवडणुकीत पहिल्याच घासाला खडा लागू नये, यासाठी सुभाष देशमुखांनी दक्षिण तालुक्यात खूप काही पेरल्याची चर्चा आहे.
म्हेत्रे अन् शेळकेंसह शिवसेनेची किती होणार मदत?
‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ तो आपला मित्र हे समीकरण बाजार समितीच्या निवडणुकीत दिसत आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे राजकीय कट्टर दुश्मन माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलसोबत आहेत.शिवाय दक्षिण सोलापूर तालुक्यातील नेते बाळासाहेब शेळके, बळीराम साठे हेदेखील देशमुख यांच्याच पैनलच्या समर्थनात आहे. त्याशिवाय शिवसेनेनेदेखील देशमुख पॅनलला पाठिंबा दिला आहे. या सर्वांच्या पाठिंब्याचा परिपाक निवडणुकीत का दिसतो. सुभाष देशमुखांच्या पॅनलसाठी खरोखर त्यांच्या नेतृत्वाची ताकद किती लागली, हे निकालातून दिसणार आहे.
दादा, अन् बापू यांच्यापैकी कोण कोणाला ठरणार भारी?
नेतृत्वाचा ‘वजनदारपणा’चा फैसला अवघ्या काही तासांवर
तसं तर आमदार सुभाष देशमुख हे राजकारणात तुलनेत आमदार सचिन कल्याणशेट्टींच्या तुलनेत खून सिनियर आहेत. कल्याणशेट्टी यांनी सुभाष देशमुख यांच्याकडून राजकारणाचे धडे गिरवले, खूप काही समजून-उमजून घेतले. तेच कल्याणशेट्टी बाजार समितीच्या निवडणुकीच्या वळणावर सुभाष देशमुखांच्या विरुद्ध आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने, दोघांच्याही नेतृत्वाचा अक्षरश: कस लागला आहे. दोघांचे तालुक्यातल्या राजकारणातलं ‘पाणी’ या निवडणुकीच्या निकालातून कळणार आहे. सुभाष देशमुख भारी की सचिन कल्याणशेट्टी हे मंगळवारी कळणार आहे अन् तेही मतदारांच्या कौलातून.
‘यांच्या’ वजनदार नेतृत्वाच्या युतीचा दिसेल का करिष्मा?
सचिन कल्याणशेट्टी, दिलीप माने, सुरेश हसापुरे यांनी पॅनल उभं केलं आहे. युतीच्या माध्यमातून हातात हात घालीत त्यांनी हे पॅनल आखाड्यात उतरवताना शहाजी पवार, अविनाश मार्तंडे, माजी आमदार यशवंत माने, इंदूमती अलगोंड, गणेश वानकर या ‘खत्रों के खिलाडी’ शिलेदारांचं वजनदार नेतृत्व कल्याणशेट्टी, माने, हसापुरे यांना विजयाचा गुलाल अंगावर घेण्याला कितीपत भारी ठरलं हे मंगळवारी कळेल.