अमरावती, 19 जून (हिं.स.) देशातील भावी पिढीचे भवितव्य उज्वल करायचे असेल शाळांमध्ये मोबाईल बंदी करणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांमध्ये विद्यार्थ्याच्या मोबाईल वापरावर बंदी यावी याकरिता आर्वी मतदार संघाचे आमदार येत्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार आहे. विशेष म्हणजे आ.वानखेडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी पत्रव्यवहार करून मोबाईल बंदी करण्याबाबत विनंती केली आहे. अमरावती जिल्ह्यातील शिक्षक सुधीर केने यांच्या संशोधनाची दखल घेत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयाचे माध्यमिक शिक्षक सुधीर पंजाबराव केने यांनी मोबाईल बंदी संदर्भात संशोधन केले आहे. गत पाच वर्षापासून त्यांनी विद्यार्थ्यांच्या वर्तनाबाबत नोंदी घेतल्या असून या बाबत बालरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, नेत्र तज्ज्ञ, अस्थी रोग तज्ज्ञ, मेंदू विकार तज्ञांच्या मुलाखती घेतल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मोबाईलच्या व्यसनामुळे विद्यार्थ्याना भविष्यात कॅन्सर, मानदुखी, विसरभोळेपणा, चिडचिडेपणा, अंधत्व, चक्कर येणे अश्या अनेक आजाराची झपाट्याने लागण होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. या सर्वांमुळे नवीन पिढीचे भवितव्य धोक्यात आले आहे.
मोबाईल वरील गेम, सोशल मीडियाच्या अती वापराने विद्यार्थी हिंसक बनली आहे. परदेशप्रमाणे अमरावतीच्या विद्यार्थ्यांच्या दफ्तरमध्ये बंदूक आढळून आल्याची घटना नुकतीच गाजली आहे. आश्ट्रेलियासारख्या प्रगत देशाने विद्यार्थ्याना सोशल मीडियावर बंदी घालून संसदेत कायदा पारित केला आहे. बोहरा समाजाने सुध्दा मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी घातली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये मोबाईल बंदी यावी यासाठी सुधीर केने यांनी आ.सुमित वानखेडे तसेच मुख्यमंत्री यांचेशी पत्रव्यवहार केला आहे. या पत्राची दखल घेत आ. सुमित वानखेडे येत्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाकडून नवोपक्रमाची दखल
सुधीर केने यांनी त्यांच्या शाळेतील इयत्ता ५ ते १२ वी विद्यार्थ्यांवर मोबाईल बंदी करून संशोधन केले. त्यांना विद्यार्थ्यांच्या आळस कमी होऊन गुणवत्ता वाढीस लागल्याचे दिसून आले आहे. या नवोपक्रम दखल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी घेत सुधीर केने यांना सन्मानित केले आहे.