पुणे, 11 मे (हिं.स.)। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बदनामी प्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात राहुल गांधी वारंवार तारखा मागत असल्याने त्यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी न्यायालयात केली आहे. राहुल गांधी यांनी याचिकेवर म्हणणे नोंदविणे टाळल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर राहुल गांधींच्या वतीने वकील मिलिंद पवार २८ मे रोजी न्यायालयात उत्तर देणार आहेत.
दरम्यान, गांधी यांच्या वकिलांनी सावरकर लिखित पुस्तकांची इंग्रजी आवृत्ती व वादग्रस्त भाषणाचा पेन ड्राइव्ह न्यायालयात मागवला होता, जो सावरकर पक्षाने सुपूर्द केला आहे. राहुल गांधी वारंवार तारखा मागत असल्याने खटल्याच्या सुनावणीत अडथळे निर्माण होत आहे. खटल्याच्या सुनावणीस स्थगिती मागणार नाही, तसेच खटल्याच्या प्रत्येक तारखेला गांधी यांचे वकील उपस्थित राहणार आहे,
या अटींवर न्यायालयाने गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. या अटींचे उल्लंघन करण्यात येत आहे. यामुळे राहुल गांधी यांचा जामीन रद्द करून मुचलका जप्त करण्यात यावा, तसेच गांधी न्यायालयात उपस्थित राहतील, हे निश्चित करावे, असा अर्ज सात्यकी सावरकर यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी न्यायालयात सादर केला आहे. लंडनमध्ये एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी अनिवासी भारतीयांसमोर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केले होते. सावरकर यांचे नातू सात्यकी यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता